IND vs BAN 1st Test Yashasvi Jaiswal grab superb diving catch : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी ५१५ धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने दमदार सुरुवात केली. सलामीवीर झाकीर हसन आणि शादमान इस्लाम यांच्यात पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी झाली. दोघे चांगली फलंदाजी करत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असल्याचे दिसत होते. मात्र, जसप्रीत बुमराहने झाकीर हसनला बाद करत बांगलादेशला पहिला धक्का दिला. ज्याचा उत्कृष्ट झेल स्लीपमध्ये यशस्वी जैस्वालने घेतला. बीसीसीआयने त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

जैस्वालने डावीकडे डायव्हिंग करत घेतला उत्कृष्ट झेल –

बांगलादेशच्या दुसऱ्या डावाच्या १७व्या षटकात बुमराहच्या दुसऱ्या चेंडूवर झाकीरने शॉट मारला, पण चेंडू बॅटच्या काठावर लागला आणि स्लीपमध्ये गेला जिथे यशस्वी जैस्वालने डावीकडे डायव्हिंग करत उत्कृष्ट झेल घेतला. जसप्रीत बुमराहही त्याच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक करताना दिसला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झाकीर हसनने ४७ चेंडूंत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३३ धावांचे योगदान दिले. या विकेटसह जसप्रीत बुमराहने मोठा पराक्रम केला. तो हाँगकाँगचा गोलंदाज एहसान खानला मागे टाकले २०२४ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.

जसप्रीत बुमराहने केला मोठा पराक्रम –

हाँगकाँगचा एहसान खानने बुमराहने मागे टाकण्यापूर्वी ४६ विकेट्स घेतल्या होत्या. आता जसप्रीत बुमराहने या वर्षात आतापर्यंत १४ सामन्यात ४७ विकेट घेतल्या आहेत. त्याने ६ कसोटी सामन्यांच्या १२ डावात ३२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने ८ टी-२० सामन्यात १५ विकेट्स घेतल्या आहेत. या वर्षात त्याने एकही वनडे सामना खेळलेला नाही.

हेही वाचा – IPL 2025 Mega Auction : ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडणार की नाही? रिटेंशनबाबत आली मोठी अपडेट

खराब प्रकाशामुळे पंचांनी सामना थांबवला –

भारताच्या ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश ४ बाद १५८ धावांवर फलंदाजी करत होता. पण अचानक चेन्नईमधील हवामान बदलल्याने सामना थांबवण्यात आला. खराब हवामानामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ पूर्ण होऊ शकला नाही. संध्याकाळ जसजशी होत होती तसे काळे ढग मैदानात दाटून आले आणि मग खराब प्रकाशामुळे पंचांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी शुभमन गिल आणि ऋषभ पंत या दोघांच्या शतकामुळे भारती ४ बाद २८७ धावांवर डाव घोषित केला. भारतीय संघाने पहिल्या डावा २२८ धावांची आघाडी घेतली होती, ज्यामुळे बांगलादेशला ५१५ धावंचे लक्ष्य मिळाले.