India vs Nederland, ICC World Cup 2023: २०२३या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यापासून भारतीय संघाने एक विशेष उपक्रम सुरू केला आहे, सामन्यानंतर प्रशिक्षक सर्वोत्तम क्षेत्ररक्षण केल्याबद्दल खेळाडूची निवड करतात आणि त्याला पदक देतात. पहिल्याच सामन्यात विराट कोहलीला हा पुरस्कार मिळाला होता. भारतीय संघाने काल नेदरलँड्सविरुद्ध गट टप्प्यातील शेवटचा सामना खेळला, या सामन्यात या पदकाचे दावेदार सूर्यकुमार यादव, के.एल. राहुल आणि रवींद्र जडेजा होते. त्यात सूर्यकुमार यादवला हे पदक जिंकण्यात यश मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरवेळी प्रमाणेच गोलंदाजी प्रशिक्षकाने सामन्यानंतर सर्व खेळाडूंना संबोधित केले आणि नंतर सर्वांना मैदानात नेले. मोठ्या पडद्यावर तीन स्पर्धकांच्या नावांची घोषणा करण्यात आली. प्रथम अष्टपैलू रवींद्र जडेजाचे नाव घेतले गेले, नंतर फलंदाज सूर्यकुमार यादव आणि नंतर विकेटच्या मागे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या के.एल. राहुलची सर्वोतम स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली. त्यातून सूर्यकुमार यादवने बाजी मारत हे पदक पटकावले. दरम्यान, टीम इंडियाने गट टप्प्यातील सर्व ९ सामने जिंकल्यानंतर संघातील खेळाडू खूप आनंदी दिसत होते. सामन्यानंतर ते मजामस्ती करताना दिसले.

सूर्यकुमार यादवची नेदरलँडविरुद्ध सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून निवड करण्यात आली, याची घोषणा यावेळीही मोठ्या पडद्यावर करण्यात आली. त्यानंतर सूर्याला पदक प्रदान करण्यात आले. काल सूर्यकुमार यादवनेही गोलंदाजी केली, त्याने २ षटकात १७ धावा दिल्या. श्रेयस अय्यर आणि यष्टिरक्षक के.एल. राहुल वगळता इतर सर्व ९ खेळाडूंनी नेदरलँड्सविरुद्ध गोलंदाजी केली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने ४१० धावांचा मोठा डोंगर उभारला होता. रोहित शर्माने ६१, शुबमन गिल आणि विराट कोहलीने प्रत्येकी ५१-५१ धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुल यांनी आपापली शतके पूर्ण केली. अय्यरने ९४ चेंडूत १० चौकार आणि ५ षटकारांसह १२२ धावा केल्या. राहुलने ६४ चेंडूत ४ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या. नेदरलँडचा संघ २५० धावांवर सर्वबाद झाला, भारताने १६० धावांनी हा सामना जिंकला.

हेही वाचा: IND vs NED: रोहित ब्रिगेडने भारताला दिली दिवाळी भेट, नेदरलँड्सवरील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी केले कौतुक

विश्वचषकात तिसऱ्यांदा एका संघाने नऊ गोलंदाजांचा वापर केला आहे. १९८७ मध्ये पहिल्यांदा पेशावरमध्ये श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडच्या नऊ खेळाडूंनी गोलंदाजी केली होती. त्यानंतर १९९२ मध्ये क्राइस्टचर्चमध्ये पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंडने नऊ खेळाडूंना गोलंदाजी करण्यात सांगितले होते. आता ३१ वर्षांनंतर भारताने ही कामगिरी केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ned three contenders for best fielder in india vs nederland match suryakumar yadav gets the award avw
Show comments