India vs New Zealand 2nd Test Updates in Marathi: भारतीय संघ पुणे कसोटीतही पहिल्या डावात चांगली धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला आणि झटपट आपले विकेट्स गमावले. मिचेल सँटरनच्या ७ विकेट्सच्या जोरावर किवी संघाने भारताला १५६ धावांवर ऑल आऊट केले. अशारितीने भारतीय फलंदाज पुन्हा एकदा निराशाजनक फलंदाजी करताना दिसले.फिरकीसाठी अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या फिरकीपटूने आपल्या फिरकीची जादू दाखवली. पहिल्या बंगळुरू कसोटीत टीम इंडिया ४६ धावांवर सर्वबाद झाल्यामुळे भारताला त्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.

भारतीय संघ १५६ धावांवर सर्वबाद झाल्याने आता किवी संघाकडे १०३ धावांची आघाडी आहे. भारताकडून पहिल्या डावात वॉशिंग्टन सुंदरने ७ विकेट्स घेतले तर न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरनेही ७ विकेट्स घेतले आहेत. भारताकडून यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि रवींद्र जडेजा चांगली कामगिरी करू शकले. या दोघांनाही ३० धावांचा आकडा गाठला याशिवाय भारताचे सर्व फलंदाज बेजबाबदारपणे फलंदाजी करताना दिसले.

हेही वाचा – IND vs NZ: मला काय माहित त्याला हिंदी समजते…”, पंत आणि वॉशिंग्टन सुंदरची योजना फसली; VIDEO मध्ये पाहा काय घडलं?

भारताकडून फलंदाजी करताना पहिल्याच दिवशी सलामीवीर रोहित शर्मा खातेही न उघडता साऊदीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. यानंतर यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिलने भारताचा डाव पुढे नेण्याचा चांगला प्रयत्न केला, पण फिरकीसमोर दोघेही मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत. शुबमन गिल दुसऱ्या दिवशी ३० धावा करत बाद झाला आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक भारताचे फलंदाज माघारी परतले. यशस्वी जैस्वालही त्यानंतर ३० धावा करत बाद झाला. विराट कोहलीची विकेट तर सहजी तोसुद्धा विसरणार नाही. कारण विराट कोहली फुलटॉस चेंडूवर अनपेक्षितपणे बाद झाला आणि १ धावा घेत तो माघारी परतला. सँटनरने टाकलेला चेंडू मारायला चुकला आणि चेंडू थेट विकेटवर जाऊन आदळला.

हेही वाचा – VIDEO: ५२/२ ते ५३ वर ऑल आऊट, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाने एका धावेच्या अंतरात गमावल्या ८ विकेट्स

ऋषभ पंत आणि सर्फराझ खानकडून एका महत्त्वपूर्ण भागीदारीची आणि चांगल्या खेळीची अपेक्षा होती. पण हे दोघेही स्वस्तात बाद झाले. पंतला ग्लेन फिलिप्सने क्लीन बोल्ड केलं तर सर्फराझ खान बेजबाबदारपणे फटका मारत झेलबाद झाला. यानंतर आलेल्या रवींद्र जडेजाने संघाचा डाव पुढे नेला. जडेजाने ४६ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३८ धावांची चांगली खेळी केली पण सँटनरच्या फिरकीपुढे तोही फार मोठी धावसंख्या रचू शकला नाही.

हेही वाचा – बाळाच्या जन्माची माहिती मिळताच सामना अर्धवट सोडून गेला क्रिकेटपटू अन् मग…, क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडला असा अनोखा प्रसंग

जडेजा बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि आकाशदीपने चौकार, षटकार लगावत काही प्रमाणात भारताला धावा करून दिल्या, पण फार काळ मैदानात टिकू शकले नाहीत. अशारितीने मिचेल सँटरनने कसोटीतील उत्कृष्ट स्पेल टाकत भारतीय संघाला दणका दिला. सँटरनने १९.३ षटकांत ५३ धावा देत ७ विकेट्स घेतले.