IND vs NZ India broke the embarrassing record of 50 years ago : भारतीय संघासाठी मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका अपेक्षेप्रमाणे राहिली नाही, ज्यामध्ये त्यांना पहिल्या दोन सामन्यांमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागले, तर मुंबई कसोटीतही टीम इंडियाचा पहिला डाव २६२ धावांवर आटोपला. या मालिकेत आतापर्यंत भारतीय संघाला फलंदाजांच्या खराब कामगिरीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे प्रथम बंगळुरु कसोटी आणि नंतर पुण्यात एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघाच्या फलंदाजांच्या खराब कामगिरीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, त्यांनी ५० वर्षांपूर्वीचा नकोसा विक्रमही मोडला.
भारताने मोडला ५० वर्षांपूर्वीचा नकोसा विक्रम –
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत भारतचे १३ खेळाडू शून्यावर बाद झाले असून, मुंबई कसोटी सामन्यात अजून एक डाव बाकी आहे आणि ही संख्या वाढू शकते. भारतीय संघासाठी, आतापर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासात तीन किंवा त्यापेक्षा कमी सामन्यांच्या कसोटी मालिकेत शून्यावर बाद होण्याची ही सर्वाधिक संख्या आहे. विशेष म्हणजे हा विक्रमही मायदेशात झाला आहे. यापूर्वी १९७४ मध्ये इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाचे १२ खेळाडू कसोटी मालिकेत शून्यावर बाद झाले होते. अशाप्रकारे आता हा विक्रम मोडीत निघाला असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आणखी एक लाजिरवाणा नवा विक्रम केला आहे.
तीन किंवा त्यापेक्षा कमी सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचे फलंदाज सर्वाधिक शून्यावर बाद होण्याची संख्या :
- १३ – विरुद्ध न्यूझीलंड (२०२४, मायदेशात)
- १२- विरुद्ध इंग्लंड (१९७४, विदेशात)
- १० – विरुद्ध ऑस्ट्रेलिया (१९९९-२०००, विदेशात)
- १० – वि दक्षिण आफ्रिका (२०२०-२१, विदेशात)
मुंबई कसोटीत भारताचे तीन खेळाडू झाले शून्यावर बाद –
मुंबई कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. यामध्ये मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि सर्फराझ खानच्या नावाचाही समावेश आहे. सर्फराझ खान जो बंगळुरु कसोटीतही शून्यावर बाद झाला होता. मुंबई कसोटीतील भारताचा पहिला डाव २६३ धावांवर आटोपला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात २३५ धावा केल्या होत्या. यासह टीम इंडियाला २८ धावांची आघाडी मिळाली आहे.
हेही वाचा – Rishabh Pant : ऋषभ पंतने अवघ्या ३६ चेंडूत अर्धशतक झळकावत केला खास पराक्रम, महेंद्रसिंग धोनीलाही टाकले मागे
भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक ९० धावा केल्या. शनिवारी भारताने चार गड्यांच्या मोबदल्यात ८६ धावांवरून पुढे खेळायला सुरूवात केली होती. यानंतर उर्वरित सहा विकेट्स गमावून १७७ धावा केल्या. शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांनी आज भारतीय डाव पुढे नेताना आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ९६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. या काळात पंतने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १३वे अर्धशतक तर गिलने सातवे अर्धशतक झळकावले.
© IE Online Media Services (P) Ltd