IND vs NZ 2nd Test India in danger of losing the Test series at home : टीम इंडियाला १२ वर्षांनंतर आपल्याच घरात कसोटी मालिका गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुण्यात खेळल्या जात असलेल्या कसोटीत भारताची स्थिती ‘करो या मरो’ अशा स्वरुपाची झाली आहे. पुण्याच्या टर्निंग पिचवर भारताचा पहिला डाव १५६ धावांवर आटोपला. यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५ बाद १९८ धावा केल्या असून पहिल्या डावाच्या जोरावर १०३ धावांची आघाडी घेतली. ज्यामुळे किवी संघाची आघाडी ३०१ धावांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे भारतीय संघ सलग दुसऱ्या कसोटीसह मालिका गमावण्याची शक्यता निर्माण झाली.

सध्या पहिल्या डावाच्या आधारे न्यूझीलंड संघाककडे ३०१ धावांची आघाडी आहे. अशात पुण्याच्या टर्निंग पिचवर ३५० धावांचे लक्ष्यही सामना जिंकण्यासाठी पुरेसे आहे. न्यूझीलंड संघाने दुसऱ्या डावात २५० धावा केल्या, तरी भारतासमोर विजयासाठी किमान ३५० धावांचे लक्ष्य असेल. पुण्याच्या टर्निंग पिचवर ३०० ते ३५० धावांचे लक्ष्य गाठणे म्हणजे डोंगर चढण्यासारखे असेल. इथून आता टीम इंडियाचं पुनरागमन जवळपास अशक्य वाटत आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद २५९ धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघ १५६ धावांवर गारद झाला आहे. तसेच दुसऱ्या डावात न्यूझीलंडने ५ बाद १९८ धावा केल्या आहेत.

भारताला घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावण्याचा धोका –

न्यूझीलंडचा संघ ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. जर भारताने पुण्यातील दुसरा कसोटी सामना गमावला तर २०१२ नंतर प्रथमच घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावेल. भारतीय भूमीवर २०१२ मध्ये टीम इंडियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने २-१ असा विजय मिळवला होता. २०१२ मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले होते. या मालिकेत भारताचे सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग सारखे दिग्गज अपयशी ठरले होते. अशात आता भारताला १२ वर्षांनंतर आपल्याच घरात कसोटी मालिका गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा – IND vs NZ : संजय मांजरेकरांनी कोहलीबद्दल केलेल्या ट्वीटमुळे पेटला नवा वाद, विराट-रोहितच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर जुंपली

ॲलिस्टर कूकच्या पराक्रमाची पुनरावृत्ती होणार का?

त्यावेळी ॲलिस्टर कुक आणि केव्हिन पीटरसन यांनी त्या मालिकेत भारतीय फिरकी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले होते. आता न्यूझीलंडचा संघही २०१२ मधील इंग्लंडच्या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याच्या जवळ आहे. न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांनी या मालिकेत आतापर्यंत रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील चाचपडतात हे सिद्ध केले आहे. यानंतर संपूर्ण दडपण भारतीय फलंदाजांवर आले आहे, ज्यांना टर्निंग पिचवर जास्त धावा करण्याचा अनुभव नाही. पुण्याची टर्निंग पिचवर रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋषभ पंत आणि विराट कोहलीसारखे फलंदाज किवी फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करताना दिसले आहेत.