IND vs NZ India lost a Test series at home after 12 years : न्यूझीलंडने पुण्यात भारताचे पानिपत करत सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात दारुण पराभव केला. या पराभवसह भारतीय संघाला १२ वर्षानंतर प्रथमच मायदेशात कसोटी मालिका गमवावी लागली आहे. याआधी भारताने २००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी मालिका गमावली होती. पुण्यातील सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाला ३५९ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २४५ धावांतच न्यूझीलंडच्या फिरकीसमोर गुडघे टेकले. ज्यामुळे किवी संघाने ११३ धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी मिचेल सँटनरसमोर सपशेल शरणागती पत्करली. या विजयासह न्यूझीलंडने भारतात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली.

१२ वर्षानंतर भारतीय संघाने मायदेशात कसोटी मालिका गमावली –

न्यूझीलंडचा संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० ने अभेद्य आघाडी घेतली आहे. भारताने पुण्यातील दुसरा कसोटी सामना गमावत २०१२ नंतर प्रथमच घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली. २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या गेलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ असा भारताला पराभव पत्करावा लागला होता. या मालिकेत इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले होते. या मालिकेत भारताचे सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग सारखे दिग्गज अपयशी ठरले होते. आता १२ वर्षांनंतर भारताला मायदेशात कसोटी मालिका गमवावी लागली आहे.

२००० नंतर भारतात कसोटी मालिका जिंकणारा न्यूझीलंड हा चौथा संघ आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने ही कामगिरी केली होती. यासह टीम इंडियाचा घरच्या मैदानावर सलग १८ मालिका विजयांची मालिका खंडीत जाली. न्यूझीलंडसाठी मिचेल सँटनरने पहिल्या डावात सात आणि दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या. भारताकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक ७७ धावा केल्या. याशिवाय रवींद्र जडेजाने ४२ धावांची खेळी केली.

हेही वाचा – IND vs NZ : यशस्वीने मोडला वीरेंद्र सेहवागचा विक्रम; सीनिअर खेळाडूंची मोडली सद्दी

भारतीय फलंदाजांनी मिचेल सँटनरसमोर टेकले गुडघे –

या दोघांशिवाय अन्य कोणताही फलंदाज २५ हून अधिक धावा करू शकला नाही. कर्णधार रोहित शर्मा आठ धावा करून बाद झाला, शुबमन गिल २३ धावा करून बाद झाला, विराट कोहली १७ धावा करून बाद झाला, ऋषभ पंतला खातेही उघडता बाद झाला, सर्फराझ खान नऊ धावा करून बाद झाला आणि रविचंद्रन अश्विन १८ धावा करुन बाद झाला. आकाश दीप एक धाव करू शकला आणि जसप्रीत बुमराह १० धावा करून नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या.

भारताच्या हातातून सामना कुठे निसटला?

न्यूझीलंडने पहिल्या डावात १०३ धावांची आघाडी घेतली होती, अशा स्थितीत टीम इंडियाला किवी संघाला छोट्या धावसंख्येपर्यंत रोखणे आवश्यक होते. पण इथे न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम भारताच्या मार्गात अडथळा ठरला, ज्याने ८६ धावांची खेळी करत टीम इंडियाला विजयापासून दूर नेले. टॉम ब्लंडेल आणि ग्लेन फिलिप्स यांनीही अनुक्रमे ४१ आणि ४८ धावांचं योगदान दिलं, पण टॉम लॅथमची अर्धशतकी खेळी भारतासाठी सर्वाधिक नुकसानकारक ठरली.

हेही वाचा – Rohit Sharma : ‘हॅप्पी रिटायरमेंट रोहित शर्मा…’, आठ डावात सात वेळा अपयशी ठरल्यानंतर चाहत्यांकडून हिटमॅन ट्रोल, मीम्स व्हायरल

फलंदाजीतील अपयश भारताच्या मालिका पराभवाचे प्रमुख कारण –

फलंदाजीतील अपयश हेही भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण होते. पुणे कसोटीच्या दोन्ही डावांत रोहित शर्माला दुहेरी आकडाही गाठता आला नाही, तर विराटने दोन्ही डावांत मिळून केवळ १८ धावा केल्या. त्याच्याशिवाय मधल्या फळीतील ऋषभ पंतने पहिल्या डावात १८ धावा केल्या आणि दुसऱ्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही. बेंगळुरू कसोटी शतकवीर सर्फराझ खान यावेळी कोणतीही जादू दाखवू शकला नाही. एकूणच, फलंदाजीतील अपयश हे टीम इंडियाच्या मालिका पराभवाचे प्रमुख कारण बनले आहे.