IND vs NZ Tom Latham reaction after the historic win : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताला १३२ धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारताने १२ वर्षांनंतर मायदेशात पहिली कसोटी मालिका गमावली आहे. न्यूझीलंडने ६९ वर्षांनंतर भारताचा बालेकिल्ला भेदत पहिली कसोटी मालिका जिंकली. या ऐतिहासिक कामगिरीनंतर किवी संघाचा कर्णधार टॉम लॅथम खूपच आनंदी दिसत होता. लॅथमने टीम इंडियाविरुद्धची मालिका २-० ने जिंकल्यानंतर या विजयाचे श्रेय दोन खास खेळाडूंना दिले.

टॉम लॅथम काय म्हणाला?

न्यूझीलंड संघाचा कर्णधार टॉम लॅथमने भारताविरुद्ध ऐतिहासिक मालिका जिंकण्याचे श्रेय मिचेल सँटनरला दिले. या फिरकीपटूने पहिल्या डावात सात आणि दुसऱ्या डावात सहा, अशा एकूण १३ विकेट्स घेत न्यूझीलंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे त्याने दोन्ही डावाता भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला बाद केले. त्याच्या फिरकीचा सामना करताना भारताचे हतबल दिसले. याच कारणामुळे किवी कर्णधाराने त्याला विजयाचे श्रेय दिले.

टॉम लॅथमने विजयाचे श्रेय मिचेल सँटनरला दिले –

टॉम लॅथम म्हणाला, ‘हा ऐतिहासिक विजय आमच्यासाठी खूपच खास आहे. आमच्या संपूर्ण टीमने एकजूटीने प्रयत्न केल्याने हा मोठा विजय मिळवू शकलो. यामध्ये मिचेल सँटनरचा विशेष उल्लेख करावा लागेल. कारण त्याचा या विजयात सर्वांत जास्त मोलाचा वाटा होता. त्याने दोन्ही डावात विलक्षण गोलंदाजी केली. तो बराच काळ या संघाचा भाग आहे आणि शेवटी त्याला खेळण्याची संधी मिळाली, ज्याचे त्याने सोने केले. या सामन्यात त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यामुळे या विजयाचे श्रेय त्याला जाते.’

हेही वाचा – IND vs NZ : २४ वर्षांत टीम इंडियावर तिसऱ्यांदा ओढवली नामुष्की; मायदेशात गमावले सलग दोन कसोटी सामने

टॉम लॅथमकडून ग्लेन फिलिप्सचे कौतुक –

ग्लेन फिलिप्सबद्दल बोलताना टॉम लॅथम म्हणाला, ‘आज सकाळी ग्लेन फिलिप्स ज्या प्रकारे खेळला, त्याची खेळी खरोखरच महत्त्वाची होती. भारतीय संघ पुनरागमन करणार करेल हे आम्हाला माहीत होते. मात्र, ते इतक्या चांगल्या प्रकारे पुनरागमन करतील हे आम्हाला माहित नव्हते, परंतु आम्ही मधल्या सत्रात विकेट्स घेण्यात यशस्वी झालो. आम्हाला शेवटच्या दोन विकेट्स घ्यायला खूप वेळ लागला, पण जेव्हा टिमने कॅच घेतला, तेव्हा आमच्या आनंदाला पारावार उरला नाही.’

दुसऱ्या सामन्यात टॉम लॅथमने अतिशय शानदार खेळी साकारली. दुसऱ्या डावात त्याने ८६ धावा केल्या, त्यामुळे न्यूझीलंडला भारताविरुद्ध दुसऱ्या डावात २५५ धावा करण्यात यश आले. तसेच, किवी संघाने पहिल्या डावात १०३ धावांची मोठी आघाडी घेतली होती, त्यामुळे भारताला तिसऱ्या दिवशी ३५९ धावांचे लक्ष्य मिळाले होते, ज्याचा पूर्ण करण्यासाठी भारतीय संघाला खूप घाम गाळावा लागला.

हेही वाचा – IND vs NZ : पुण्यात पानिपत; १२ वर्षानंतर भारतीय संघाने मायदेशात गमावली कसोटी मालिका

टीम इंडियाने १२ वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली –

या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पहिल्या डावात २५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ अवघ्या १५६ धावांवर गारद झाला. ज्यामुळे पाहुण्या संघाने १०३ धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर दुसऱ्या डावात किवी संघाने २५५ धावा केल्या. ज्यामुळे न्यूझीलंडने ३६२ धावांचे लक्ष्य दिले. हे लक्ष्य गाठण्यात भारतीय संघ अपयशी ठरला आणि परिणामी संपूर्ण संघ २४५ धावांत गारद झाला. अशा प्रकारे न्यूझीलंडविरुद्ध ११३ धावांनी पराभूत झाल्यामुळे भारताला १२ वर्षांनंतर मायदेशात मालिका गमावावी लागली.