IND vs NZ 1st Test Day 3 Highlights: बंगळुरू कसोटीत भारतीय संघ ४६ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर न्यूझीलंडने फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारला. रचिन रवींद्र शतकी खेळीच्या जोरावर आणि उत्कृष्ट भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंड संघाने ४०२ धावा केल्या आहेत. भारतीय संघाने सातत्याने सामन्यात पुनरागमन केले पण वेळोवेळी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारताच्या प्रयत्नांवर पाणी फेरले. अशारितीने न्यूझीलंडने ३५६ धावांची मोठी आघाडी मिळवली आहे.

रचिन रवींद्र-टीम साऊदीची शतकी भागीदारी

रचिन रवींद्रने कसोटी क्रिकेटमधील दुसरे शतक झळकावून भारतीय संघामध्ये पराभवाची भिती निर्माण केली आहे. त्याच्या १३४ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावून ४०२ धावांची मोठी धावसंख्या उभारली. अशा प्रकारे पहिल्या डावाच्या आधारे भारतावर ३५६ धावांची डोंगरासारखी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला डावाचा पराभव टाळायचा असेल, तर त्यांनी ही आघाडी तर घ्यावीच लागेल, शिवाय किमान एवढी मोठी धावसंख्याही उभारावी लागेल, जेणेकरून भारतीय सामना जिंकू शकेल किंवा अनिर्णित राहील.

हेही वाचा – Rohit Sharma: “माझ्यामुळे संघाची ही स्थिती…”, रोहित शर्माचे भारत ४६ वर ऑल आऊट झाल्यानंतर मोठे वक्तव्य, नाणेफेकीच्या निर्णयाबद्दल पाहा काय म्हणाला?

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर पहिल्या सत्रात न्यूझीलंडने झटपट विकेट्स गमावले. पण रचिनने फिरकीविरूद्ध चांगली खेळी करत आपले शतक पूर्ण केले. तर टीम साऊदीने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने सर्वांनाच चकित केले. साऊदीने सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत त्याने वीरेंद्र सेहवागला मागे टाकले, तर ७३ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या. या दोघांच्या १३७ धावांची भागीदारी भारतासाठी घातक ठरली.

तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला मोहम्मद सिराजने पहिल्याच सत्रात भारताला पहिली विकेट मिळवून दिली. त्याने डॅरिल मिचेलला स्लिपमध्ये यशस्ली जैस्वालकरवी झेलबाद केले. टॉम ब्लंडेल क्रीझवर फार काळ टिकू शकला नाही आणि जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर दुसऱ्या स्लिपमध्ये झेलबाद झाला. त्यानंतर जडेजाने मॅट हेन्री आणि ग्लेन फिलिप्सला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर कुलदीपने एजाज पटेलला पायचीत केलं आणि मग रचिन रवींद्रला बाद करत न्यूझीलंडचा डाव संपवला.

हेही वाचा – PAK vs ENG: पाकिस्तानने दमदार पुनरागमनासह इंग्लंडचा उडवला धुव्वा, नोमान अलीने विक्रमी ११ विकेट घेत लाजिरवाण्या पराभवाचा घेतला बदला

न्यूझीलंडने मोडला १२ वर्षे जुना विक्रम

न्यूझीलंड संघाने उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर १२ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. २०१२ नंतर भारतासमोर कसोटी सामन्यात एखाद्या संघाने २०० हून अधिक धावांची आघाडी मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती. गेल्या वेळी इंग्लंडने इडन गार्डन्सवर भारताविरूद्ध २०७ धावांची आघाडी घेतली होती. जानेवारी २०१२ नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा इंग्लंड व्यतिरिक्त इतर संघाने भारताविरुद्ध २०० अधिक धावांची आघाडी मिळवली.