IND vs PAK Match Updates: आशिया चषकाच्या सुपरफोर मध्ये भारताने पाकिस्तानचा २२८ धावांनी पराभव केला. पावसाने व्यत्यय आणलेला सामना दोन दिवसांत संपला. रविवारी (१०सप्टेंबर) सामना सुरू झाला, मात्र पावसामुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. खेळ थांबला तोपर्यंत भारताने २४.१ षटकात १४७ धावा केल्या होत्या. सोमवार हा सामन्याचा राखीव दिवस होता. पुढे खेळताना भारतीय संघाने ५० षटकांत ३५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाला ३२षटकांत आठ गडी गमावून केवळ १२८ धावा करता आल्या. नसीम शाह आणि हरिस रौफ दुखापतीमुळे फलंदाजी करू शकले नाहीत. अशा प्रकारे टीम इंडियाने २२८ धावांनी विजय मिळवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाने पाकिस्तानवर २२८ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. एकदिवसीय इतिहासातील धावांच्या बाबतीत भारताचा पाकिस्तानवरचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी टीम इंडियाने २००८ च्या आशिया कपमध्ये बांगलादेशच्या मीरपूरमध्ये १४० धावांनी त्यांचा पराभव केला होता.
भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या शतकी खेळीमुळे दोन गडी गमावून ३५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ आठ विकेट्सवर केवळ १२८ धावा करू शकला आणि सामना २२८ धावांनी गमावला. पाकिस्तान संघाला ३२ षटकात केवळ १२८ धावा करता आल्या. दुखापतग्रस्त हरिस रौफ आणि नसीम शाह फलंदाजीला आले नाहीत.

कुलदीप यादवने घेतल्या सर्वाधिक ५ विकेट्स –

पाकिस्तानचे फलंदाज कुलदीप यादवचे चेंडू समजू शकले नाहीत. कुलदीपने अप्रतिम गोलंदाजी करत आठ षटकांत २५ धावा देत पाच बळी घेतले. त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी एक विकेट घेतली.

पाकिस्तानचे फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले –

भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. संघाचे केवळ चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. फखर जमानने सर्वाधिक २७ धावा केल्या. इफ्तिखार अहमद आणि आगा सलमानने २३-२३ धावा केल्या. कर्णधार बाबर आझम १० धावा करून बाद झाला. या चौघांशिवाय एकाही फलंदाजाला १० धावांपर्यंत मजल मारता आली नाही. इमाम उल हक केवळ नऊ, शादाब खान सहा, फहीम अश्रफ चार आणि मोहम्मद रिझवान केवळ दोन धावा करू शकले. शाहीन आफ्रिदी सात धावा करून नाबाद राहिला.

विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम –

या सामन्यात विराट कोहलीने ९४ चेंडूत ३ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने नाबाद १२२ धावांची खेळी केली. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७७ शतके झळकावण्यात यश मिळवले आणि सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने ५९४ डावात ७७ शतके पूर्ण केली होती, तर कोहलीने ५६१ डावात हा पराक्रम केला आहे. कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ४७ शतके करणारा फलंदाज ठरला. त्याने सचिनचा विक्रमही मोडला. सचिनने आपल्या ४३५ व्या डावात ४७ वे एकदिवसीय शतक पूर्ण केले होते, तर कोहलीने २६७ व्या डावात हा पराक्रम केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak match updates indias historic victory over pakistan by 228 runs in asia cup 2023 vbm
Show comments