SL vs PAK, Asia Cup 2023 Shoaib Akthar: गतविजेत्या श्रीलंकेने गुरुवारी आशिया चषक सुपर-४च्या सामन्यात पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव केला. या विजयासह श्रीलंकेचा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला असून आता १७ सप्टेंबर रोजी विजेतेपदाच्या लढतीत ते भारतीय संघाशी दोन हात करतील. दुसरीकडे, स्पर्धेतील सर्वात फेव्हरेट आणि बलाढ्य संघ मानल्या जाणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याच्या आशा मावळल्या आहेत. यावर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर नाराज झाला असून त्याने संघाच्या त्रुटींवर बोट ठेवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानी चाहत्यांना आशा होती की, त्यांचा संघ अंतिम फेरीत पोहचणार आणि पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला मिळणार. मात्र, चारिथ असलंकाने शेवटच्या क्षणी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत श्रीलंकेला रोमहर्षक विजय मिळवून दिला. पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला दु:ख झाले आहे. “बाबर अँड कंपनीने आशिया चषक स्पर्धेत प्रथमच भारत-पाकिस्तान अंतिम सामना खेळण्याची संधी गमावली,” म्हणत त्याने खंत व्यक्त केली.

शोएब अख्तरने जमान खानचे कौतुक केले

शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना पाकिस्तानचा नवा वेगवान गोलंदाज जमान खानचे कौतुक केले. नसीम शाहच्या दुखापतीनंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. जमानची कृती लसिथ मलिंगासारखी आहे. या सामन्यात जमानला एकही विकेट मिळाली नाही आणि त्याने सहा षटकांत ३९ धावा दिल्या. तरीही त्याने अख्तरला त्याच्या गोलंदाजीने प्रभावित केले.

माजी वेगवान शोएब अख्तर म्हणाला, “तुम्ही सामना पाहिला असेल की पाकिस्तान स्पर्धेतून कसा बाहेर पडला आहे. जो सामना पाकिस्तानच्या बाजूने झाला होता त्याचे सर्व श्रेय जमान खानला जाते. बुधवारी तो कोलंबोला पोहोचला होता आणि या मुलाने पाकिस्तान सुपर लीगमध्ये शानदार गोलंदाजी केली होती. पाकिस्तानला सामना जिंकण्याची जी काही संधी होती ती सर्व जमानमुळेच होती. शाहीन आफ्रिदीनेही काही विकेट्स घेतल्या, पण सामना जिंकण्याचे श्रेय जमानला जाते. त्याने खरोखरच चांगली गोलंदाजी केली.

हेही वाचा: Ben Stokes: १८२ धावांच्या तुफानी खेळीनंतर बेन स्टोक्सने जेसन रॉयची माफी मागितली; म्हणाला, “मी वर्ल्डकप खेळणार हे…”

भारत-पाकिस्तानमध्ये फायनल होऊ शकत नाही– शोएब अख्तर

रावळपिंडी एक्स्प्रेसलाही वाटले होते की, पाकिस्तान अंतिम फेरीसाठी पात्र होईल. मात्र, शुक्रवारी श्रीलंकेने चांगला खेळ केल्याने त्यांचे स्वप्न अधुरे राहिले आणि त्याने ते मान्यही केले. अख्तर म्हणाले, “पाकिस्तान आशिया कप फायनलमध्ये पोहोचण्यास पात्र होता, पण तो आता स्पर्धेतून बाहेर पडले. त्याच्यावर टीका होऊ शकते कारण त्याला ‘फेव्हरेट’ मानले जात होते. दुर्दैवाने, भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक फायनल होईल असे कधीच घडू शकत नाही. या स्पर्धेत असे कधीच घडले नाही. यावेळी त्यांना संधी होती, पण श्रीलंकेने काय शानदार खेळ केला. श्रीलंकेचा संघ अंतिम फेरीत पोहोचण्यास पात्र आहे. ते आमच्यापेक्षा खूप चांगले खेळले. ३९ वर्षांची प्रतीक्षा सुरूच असून भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा कधीच फायनल होऊ शकत नाही, आज हे सिद्ध होत आहे.”

शोएब अख्तरने संघाच्या पराभवाला लज्जास्पद म्हटले आहे

निराश शोएब अख्तरने पराभवाचे वर्णन ‘लज्जास्पद’ असे केले आणि बाबरच्या संघाला पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी तयारी करण्यास सांगितले. शोएब अख्तर म्हणाला, “हा अत्यंत लाजिरवाणा पराभव आहे. पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडणे हे अजूनही खरे वाटत नाही. पाकिस्तानला विचार करण्यासारखे बरेच काही गोष्टी घडल्या आहेत. कर्णधारपदाला थोडे अधिक चांगले निर्णय घेणे आवश्यक आहे. मी खूप निराश आहे. यापेक्षा अधिक काही सांगता येणार नाही.”

हेही वाचा: IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात होणार मोठे बदल; शमीसह आणखी तीन खेळाडूंना प्लेईंग ११मध्ये मिळणार संधी

आशिया कपमध्ये भारत-श्रीलंका नवव्यांदा फायनल

आशिया चषक स्पर्धा १९८४ पासून खेळवली जात आहे आणि ही एकदिवसीय स्वरूपातील स्पर्धेची १४वी आवृत्ती आहे. तसेच, टी२०-वन डे सह एकूण १६वी आवृत्ती आहे. आतापर्यंत या स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या ३९ वर्षांत कधीही खेळला गेला नाही. एकदिवसीय आणि टी२० सह, भारताने सात वेळा आशिया चषक जिंकला आहे आणि श्रीलंकेने सहा वेळा जिंकला आहे. भारताने १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६ आणि २०१८ मध्ये विजेतेपद पटकावले. दुसरीकडे श्रीलंकेने १९८६, १९९७, २००४, २००८, २०१४ आणि २०२२ मध्ये विजेतेपद पटकावले.

पाकिस्तान संघ दोन वेळा चॅम्पियन बनला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय आशिया चषकाची ही आठवी अंतिम फेरी असेल. २०१० मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोघे शेवटचे आमनेसामने आले होते. त्यात भारताने श्रीलंकेचा ८१ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत उभय संघांमध्ये झालेल्या गेल्या सात सामन्यांमध्ये भारतीय संघाने चार वेळा तर श्रीलंकेच्या संघाने तीन वेळा विजय मिळवला. १९८४ मध्ये राऊंड रॉबिन प्रकारात अव्वल स्थान मिळवून भारतीय संघ चॅम्पियन बनला. श्रीलंकेचा संघ उपविजेता ठरला. त्या वर्षी फायनल झाली नाही. १९८६ पासून फायनल खेळायला सुरुवात झाली.

आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत-श्रीलंका आठव्यांदा आमनेसामने आले आहेत

वर्षफॉरमॅटविजेते
१९८८वन डेभारत ६ विकेट्सनी जिंकला
१९९०/९१वन डेभारत ७ विकेट्सने जिंकला
१९९५वन डेभारत ८ विकेट्सने जिंकला
१९९७वन डेश्रीलंका ८ गडी राखून जिंकली
२००४वन डेश्रीलंका २५ धावांनी जिंकली
२००८वन डेश्रीलंका १०० धावांनी जिंकली
२०१०वन डेभारत ८१ धावांनी जिंकला
२०२३वन डे?
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak pakistan and india can never have a final why did shoaib akhtar say this avw