Ramandeep Singh Catch in IND A vs PAK A: ACC टी-२० इमर्जिंग एशिया कप २०२४ मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा ७ धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी करत प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. भारताने प्रथम फलंदाजी करताना १८३ धावांची मोठी धावसंख्या उभारली. टीम इंडियाकडून कर्णधार तिलक वर्माने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे पाकिस्तानचा संघ २० षटकांत केवळ १७६ धावा करू शकला. या सामन्यात रमणदीप सिंगने टिपलेल्या झेलची सर्वाधिक चर्चा आहे.

पाकिस्तानच्या डावातील ९व्या षटकात निशांत सिंधू गोलंदाजी करत होता. तर रमणदीप सिंग सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. निशांत संधूच्या चेंडूवर पाकिस्तानी फलंदाज यासिर खानने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, बॅट चांगली फिरवत त्याने फटकाही चांगलाच मारला. पण भारतीय क्षेत्ररक्षक रमणदीप सिंग पूर्णपणे तयार होता. धावत येत त्याने हवेत उडी घेतली आणि उडी घेत असतानाच त्याने चित्तथरारक झेल टिपला. त्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याने एका हाताने हा झेल टिपला आणि मैदानावर आदळल्यानंतरही त्याने चेंडू मात्र हातातून निसटू दिला नाही. खेळाडू आणि फलंदाजालाही कळलं नाही की नेमकं काय झालं आणि यासिर खानला बाद घोषित केलं.

हेही वाचा – IND vs NZ: भारताने न्यूझीलंडविरूद्ध पहिली कसोटी गमावली तर काय होणार? कसं असणार WTC फायनलचं समीकरण?

रमणदीप सिंगच्या या उत्कृष्ट कॅचचा व्हीडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्याच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले आहे की, रमणदीप सिंगचा झेल हा भारतीय खेळाडूंनी टिपलेल्या आतापर्यंतच्या सर्वात उत्कृष्ट कॅचपैकी एक मानला जाईल. आश्चर्यकारक आणि चित्तथरारक झेल!

हेही वाचा – IND vs NZ: बंगळुरू कसोटीत झाला वाद, रोहित शर्मा पंचांवर भडकला, किवी फलंदाजही गेले मैदानाबाहेर; नेमकं काय घडलं?

भारताचा पाकिस्तानवर रोमांचक सामन्यात विजय

इमर्जिंग आशिया कपमधील भारताच्या अ संघाने शानदार विजयाने आपल्या मोहिमेची सुरूवात केली आहे. भारत अ संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या सलामी जोडीने एक जबरदस्त सुरूवात करून देत धावसंख्येचा चांगला पाया रचला. अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंग या जोडीने शानदार सुरुवात केली. तर अभिषेकने ३५ आणि प्रभसिमरन सिंगने ३६ धावा करत पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर नेहल वढेराने २५ धावांचे योगदान दिले. तर कर्णधार तिलक वर्माने ४४ धावांची जबरदस्त खेळी करत भारताची धावसंख्या ८ बाद १८३ वर नेली.

हेही वाचा – IND vs NZ: भारतीय संघाने घडवला इतिहास, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ७ विकेट गमावून केवळ १७६ धावा करू शकला. पाकिस्तानकडून यासिर खानने ३३ धावांची, कासीम अक्रमने २७ धावांची, अराफत मिन्हासने ४१ धावांची आणि अब्दुल समदने २५ धावांची खेळी केली, पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. भारताकडून अंशुल कंबोजने भेदक गोलंदाजी करत पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर पाकिस्तानच्या कर्णधाराला क्लीन बोल्ड केलं. अंशुलने ३, रसिक दर सलामने २ आणि निशांत सिंधूने २ विकेट्स घेतले.

हेही वाचा – IND vs NZ: “जेव्हा भारताला सर्वात जास्त…,” सचिन तेंडुलकरची सर्फराझ खानसाठी खास पोस्ट, पहिल्या शतकाबद्दल पाहा काय म्हणाला?

टीम इंडियाचा पुढील सामना २१ ऑक्टोबरला युएईविरुद्ध होणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या विजयामुळे भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. यूएई संघ प्रथम स्थानावर आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात ओमानचा पराभव केला आहे.