India A vs Pakistan A ACC Men’s Emerging Teams Asia Cup 2023: पुरुष उदयोन्मुख संघ आशिया चषक २०२३ च्या उपांत्य फेरीत भारत अ ने बांगलादेश अ संघाचा ५१ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २१२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात बांगलादेश अ संघ १६० धावांवर गारद झाला. आता अंतिम फेरीत भारत अ संघ पाकिस्तान अ संघाशी भिडणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तान अ संघाने श्रीलंका अ संघाचा ६० धावांनी पराभव केला. टीम इंडियाकडून सेमीफायनलमध्ये निशांत सिंधूने ५ विकेट्स घेतल्या.

प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघाने ४९.१ षटकांत सर्वबाद २११ धावा केल्या. यादरम्यान यश धुलने कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळली. त्याने ८५ चेंडूत ६६ धावा केल्या. यशने ६ चौकार मारले. अभिषेक शर्माने ६३ चेंडूत ३४ धावा केल्या. त्याने २ चौकार आणि १ षटकार लगावला. सलामीवीर साई सुदर्शनने २४ चेंडूत २१ धावा केल्या. त्याच्या खेळीत ३ चौकारांचा समावेश होता. रियान पराग विशेष काही करू शकला नाही. तो १२ धावा करून बाद झाला. निकिन जोसने १७ धावांचे योगदान दिले. मानव सूधरने २१ धावांची खेळी खेळली. त्याने ३ चौकार मारले.

भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ १६० धावांवर गारद झाला. बांगलादेशकडून तंजीम हसनने ५१ धावांची शानदार खेळी केली. त्याने ५६ चेंडूंचा सामना करत ८ चौकार मारले. मोहम्मद नईमने ३८ धावांचे योगदान दिले. कर्णधार सैफ हसनने २२ धावांची खेळी केली, हसन जॉयने २० धावा केल्या. याशिवाय कोणीही विशेष काही करू शकले नाही. अशाप्रकारे बांगलादेशला ५१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आता अंतिम फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.

हेही वाचा: India Injured Players: जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, अय्यरसह ‘या’ पाच खेळाडूंबाबत BCCIने दिले मोठे अपडेट

टीम इंडियासाठी निशांत सिंधूने शानदार गोलंदाजी केली. त्याने ८ षटकात २० धावा देत ५ विकेट्स घेतल्या. मानव सूधरने ८.२ षटकात ३२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. अभिषेक शर्माने ३ षटकात २१ धावा देत १ विकेट आणि युवराज सिंग डोडियाने ७ षटकात ३५ धावा देत १ विकेट घेण्यात यश मिळाले.

हेही वाचा: IND vs WI: किंग कोहलीचा स्वॅग! जर्सी नंबर १८, कसोटी नंबर ५००, अन् ७६वे शतक; विराटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने श्रीलंकेचा ६० धावांनी पराभव केला आणि या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा पहिला संघ ठरला. आता भारताने दुसरा उपांत्य सामना जिंकून अंतिम फेरीतही मजल मारली आहे. २३ जुलै रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी भारताने पाकिस्तानचा पराभव केला. अशा स्थितीत टीम इंडिया चॅम्पियन होण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.

Story img Loader