मागील दोन महिने इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा खेळण्यात व्यस्त असलेले भारतीय क्रिकेटपटू पुन्हा एकदा निळी जर्सी अंगावर घालण्यास सज्ज झाले आहेत. आता भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास सुरुवात करणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान ९ जूनपासून पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी पाहुण्या दक्षिण आफ्रिकन संघाचे आज नवी दिल्लीत आगमन झाले आहे. कर्णधार टेम्बा बावुमाच्या नेतृत्त्वाखाली आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने याबाबत ट्विट केले आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ एक खास विक्रम आपल्या नावावर करू शकतो. भारतीय संघाने मागील सलग १२ टी ट्वेंटी सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. हे सलग विजय मिळवत भारतीय संघाने अफगाणिस्तान आणि रोमानियाशी बरोबरी साधली होती. आता ९ जूनला होणारा १३वा सामना जिंकून नवीन विक्रम करण्यास भारतीय संघ उत्सुक आहे.

भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघातील अनेक खेळाडू सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. डेव्हिड मिलरला तर आयपीएल खेळण्याचा चांगला अनुभव आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल हंगामात मिलरने ४८१ धावा केल्या होत्या. अशा परिस्थितीत आफ्रिकन संघाला भारताला रोखायचा असेल, तर मिलर त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.

भारतीय चमूचा विचार केला तर, या मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुल भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे.

Story img Loader