India vs South Africa, World Cup: कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड कप २०२३चा ३७वा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दक्षिण आफ्रिकेसमोर ३२७ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी झंझावाती सुरुवात केली. दोघांनी ३५ चेंडूत ६२ धावांची भागीदारी केली. या भागीदारीसह रोहित आणि शुबमनने भारतासाठी एक खास विक्रम केला.

एका वर्षातील सर्वोच्च सलामी भागीदारी

या वर्षी म्हणजे २०२३मध्ये आतापर्यंत भारताने वनडेमध्ये पहिल्या विकेटसाठी २०१९ धावा केल्या आहेत. रोहित-शुबमनच्या योगदानाशिवाय इशान किशनसह इतर फलंदाजांनीही यात मोलाचे योगदान दिले आहे. एका वर्षात भारताने सलामीच्या विकेटसाठी केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. यापूर्वी १९९८ मध्ये भारताने एकदिवसीय सामन्यात पहिल्या विकेटसाठी २००२ धावा केल्या होत्या. तर २००२ साली त्यावेळच्या सलामीच्या फलंदाजांनी १७०२ धावा केल्या होत्या.

हेही वाचा: Yuvraj on Dhoni: २०११च्या विश्वचषकाबद्दल युवराजने केला मोठा खुलासा; म्हणाला, “आम्ही कधीच जवळचे मित्र नव्हतो अन्…”

पॉवर प्लेमध्ये दुसऱ्यांदा वेगवान ५० धावा केल्या

रोहित-शुबमनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झंझावाती सुरुवात केली. भारताने अवघ्या ४.३ षटकात ५० धावा पूर्ण केल्या होत्या. या विश्वचषकात कोणत्याही संघाने सर्वात जलद ५० धावा पूर्ण करण्याचा हा दुसरा विक्रम आहे. धरमशाला येथे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला. ४.१ षटकात ५० धावा पूर्ण करणाऱ्या भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. रोहितने २४ चेंडूत ४० धावांची खेळी खेळली. आपल्या खेळीत त्याने सहा चौकार आणि दोन षटकार मारले. त्याला कागिसो रबाडाने टेम्बा बावुमाच्या हाती झेलबाद केले.

रबाडाने हिटमनला बाद करून विक्रम केला

कगिसो रबाडा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितला सर्वाधिक वेळा बाद करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने तीनही फॉरमॅट मिळून १२ वेळा रोहितला बाद केले आहे. त्या खालोखाल टीम साऊदीने ११ वेळा बाद केले आहे. तर  अँजेलो मॅथ्यूजने १० वेळा रोहित बाद केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनने रोहितला नऊ वेळा तर ट्रेंट बोल्टने रोहितला आठ वेळा बाद केले आहे.

हेही वाचा: IND vs SA: भारताची विजयी घौडदौड सुरूच! विराट कोहलीचे शतक अन् टीम इंडियाच्या गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेने टेकले गुडघे

भारताने दक्षिण आफ्रिकेचा २४३ धावांनी केला पराभव

भारताने दक्षिण आफ्रिकेचा २४३ धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाचा अजिंक्य राहण्याचा ट्रेंड कायम आहे. सलग आठ विजयांसह भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले असून आता भारत अव्वल स्थानावर राहणार हेही निश्चित झाले आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र, हा संघ यापूर्वीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाच गडी गमावून ३२६ धावा केल्या होत्या. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद १०१ धावा केल्या. त्याने वन डेमधले ४९वे शतक झळकावत सचिनच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. श्रेयस अय्यरने ७७ आणि कर्णधार रोहितने ४० धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेसाठी एडन मार्कराम वगळता सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ ८३ धावा करू शकला. मार्को जॅनसेनने सर्वाधिक १४ धावा केल्या. त्यांच्याशिवाय ड्युसेनने १३ आणि बावुमा-मिलरने प्रत्येकी ११ धावा केल्या. याशिवाय आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. भारताकडून रवींद्र जडेजाने पाच विकेट घेतल्या. मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी दोन बळी मिळाले. मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली.