India vs West Indies 2nd Test 1st Day Updates: त्रिनिदाद येथे गुरुवारपासून भारत आणि वेस्ट इंडिज संघांतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. हा दोन्ही संघांतील १००वा कसोटी आहे. त्याचबरोबर विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील ५००वा सामना आहे. विराट कोहलीने आतापर्यंत अनेक विक्रम केले आहेत. तसेच विराटच्या ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यातही विक्रमांची ही मालिका थांबली नाही. विराटने या खास सामन्यात असा पराक्रम केला आहे, जो जगातील कोणताही फलंदाज करू शकला नाही.

विराटने जगात कोणालाही न जमलेला केला कारनामा –

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकावले. विराटने १६१ चेंडूंचा सामना करताना ८ चौकारांच्या मदतीने नाबाद ८७ धावा केल्या आहेत. त्यामुळे विराट आपल्या ५०० व्या सामन्यात अर्धशतक करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. विराटपूर्वी ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या जगातील एकाही खेळाडूला अर्धशतक झळकवता आले नाही. विराटच्या कसोटी कारकिर्दीतील हे ३० वे अर्धशतक आहे.

२०११ मध्ये विराटने कसोटी पदार्पण केले होते –

विराट कोहलीने ऑगस्ट २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताकडून वनडे पदार्पण केले होते. त्यानंतर २०१० मध्ये त्याने टी-२० आणि २०११ मध्ये कसोटी पदार्पण केले. त्यानंतर पुढचे दशकभर क्रिकेट जगतात त्याने राज्य केले. महत्त्वाच्या प्रसंगी त्याने मोठ्या खेळी खेळून चाहत्यांची मने जिंकली आहेत. आशिया कप २०१२ मध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध १८३ धावांची खेळी केली होती.

हेही वाचा – IND vs WI 2nd Test: रोहित-यशस्वीनंतर विराट कोहलीचे शानदार अर्धशतक, पहिल्या दिवस अखेर भारताची धावसंख्या ४ बाद २८८

सचिननंतर विराट कोहलीच्या नावावर आहे हा विक्रम –

भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० हून अधिक सामने खेळणारा विराट कोहली हा एकमेव फलंदाज आहे. सचिन तेंडुलकरनंतर क्रिकेट विश्वात सर्वाधिक शतके करणारा तो खेळाडू आहे. त्याने ७५ शतके ठोकली आहेत. कोहलीने भारतासाठी कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक ७ द्विशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर कर्णधार म्हणून तो भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामना जिंकणारा खेळाडू आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ४० कसोटी सामने जिंकले आहेत.