३० सप्टेंबर पासून लागू करण्यात आलेल्या ‘ड्रिंक्स ब्रेक’च्या नियमावर विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली आहे. राजकोट कसोटी सामन्यात दोन्ही संघाना या नव्या नियमाचा त्रास झाल्याने विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली आहे. ‘ड्रिंक्स ब्रेक’ केवळ विकेट गेल्यानंतर किंवा षटक संपल्यानंतर घेतला जाऊ शकतो, मात्र सामनाधिकारी बाहेरच्या परिस्थितीचा (उष्णता) विचार करतील, अशी आशा कोहलीने व्यक्त केली.

नव्या नियमावर कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त करताना म्हटले की, ‘नव्या नियमानुसार ४३ मिनिटे पाणी पिण्यास बंदी आहे. अशा उष्ण वातावरणात ४५ मिनिटे पाणी न पिता फलंदाजी करणे मोठे आव्हानात्मक होते. त्यामुळे ‘आयसीसी’ भविष्यात नक्कीच या नियमावर विचार करेल, अशी आशाही कोहलीने व्यक्त केली. नवे नियम पाहून परिस्थितीशी ताळमेळ साधण्याचे काम पंचांनी करायला हवे.’ विराट कोहली म्हणाला पुढे म्हणाला की,‘पंचांनी नव्या नियमानुसार आम्हाला अधिक पाणी पिऊ दिले नाही. पण, कुठल्या परिस्थितीमध्ये खेळ होत आहे, याचाही विचार करायला हवा.’

पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि २७२ धावांनी दारूण पराभव केला. या सामन्यात पृथ्वी शॉ, विराट कोहली आणि जाडेजाने शतकी खेळी केली. तर पुजारा आणि पंतने अर्धशतकी खेळी करत संघाची धावसंख्या वाढवण्यात मोलाचे योगदान दिले. गोलंदाजीत कुलदिप आणि अश्विनने आपल्या फिरकीच्या तालावर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना नाचवले. दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली आहे.