IND W vs NZ W Match Run Out Controversy : महिला टी-२० विश्वचषक २०२४ ची सुरुवात भारतीय महिला संघासाठी चांगली झाली नाही. कारण भारताला न्यूझीलंडविरुद्ध ५८ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात न्यूझीलंड संघाच्या फलंदाजीदरम्यान वादही पाहायला मिळाला. वास्तविक, किवी संघाची फलंदाज अमेलिया केर धावा काढण्याच्या प्रयत्नात धावबाद झाली, त्यानंतर ती पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना पंचांनी तिला थांबवले आणि चेंडू डेड बॉल घोषित केला, ज्यामुळे तिला नाबाद घोषित करण्यात आले. आता या संपूर्ण प्रकरणावर भारतीय महिला संघाची खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज हिने प्रतिक्रिया दिली आहे.

नक्की काय घडलं?

भारताची फिरकीपटू दीप्ती शर्मा १४व्या षटकात गोलंदाजी करत होती. न्यूझीलंडची फलंदाज अमेलिया केरने तिच्या षटकातील शेवटचा चेंडू लाँग ऑफच्या दिशेने खेळला आणि झटपट एक धाव पूर्ण केली. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर तिथे क्षेत्ररक्षण करत होती पण तिने लगेच चेंडू टाकला नाही. कारण तो षटकाचा अखेरचा चेंडू होता. हे पाहून न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईन दुसऱ्या धावेसाठी गेली. पण हरमनप्रीतने थेट विकेटकीपरकडे चेंडू टाकला, ज्याने अमेलिया धावबाद झाली.

न्यूझीलंडची फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतत असताना चौथ्या पंचांनी तिला सीमारेषेजवळ थांबवले आणि परत जाण्यास सांगितले. हे पाहून भारतीय खेळाडूंना धक्का बसला आणि त्यांनी पंचांकडे याबाबत विचारणा केली. खरंतर झालं हे की जेव्हा दोन्ही खेळाडूंनी एक धाव घेतली, तेव्हा अंपायरने दीप्तीला तिची कॅप परत केली आणि षटक संपल्याची घोषणा केली. या आधारावर अंपायरने ‘डेड बॉल’ घोषित करून धावबाद नाकारले.

हेही वाचा – Yuvraj Singh : युवी झाला विराट कोहलीचा नवा शेजारी, मुंबईत घेतले नवीन आलिशान घर, जाणून घ्या किंमत

जेमिमा रॉड्रिग्ज काय म्हणाली?

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, अमेलिया केरच्या धावबादच्या वादावर जेमिमा म्हणाली की, जेव्हा पंचांनी दीप्तीला कॅप दिली तेव्हा मी तिथे नव्हते. मला म्हणायचे आहे की, न्यूझीलंडच्या खेळाडूंना दोन धावा असल्याचा आत्मविश्वास होता आणि अमेलिया केरनेही तेच दाखवून दिले. यानंतर ती दुसरी धाव घेत होती, तेव्हा तिला धावबाद केले. त्यामुळे अमेलिया स्वतः बाद झाल्यानंतर बाहेर जाऊ लागली होती. कारण तिला माहित होते की ती आऊट आहे. यानंतर पंचाचा निर्णय स्वीकारणे आम्हाला थोडे कठीण गेले, परंतु या सर्व गोष्टी आमच्या नियंत्रणात नाहीत, आम्ही पंचांच्या निर्णयाचा आदर करतो.

हेही वाचा – MUM vs ROI : इराणी चषकात अभिमन्यू ईश्वरनचे हुकले द्विशतक, मग असा काढला राग, पाहा VIDEO

एका पराभवाने आमच्यासाठी स्पर्धा संपत नाही –

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील पराभवाबाबत जेमिमा म्हणाली की, “किवी संघ एका प्लॅनसह मैदानात उतरला होता, आम्ही संधी निर्माण केल्या मात्र त्यांचा फायदा उठवता आला नाही. आम्ही सामन्यात पुनरागमन केले पण ते कायम राखता आले नाही. एका पराभवानंतरही ही स्पर्धा आमच्यासाठी संपलेली नाही. या सामन्यातून आम्हाला सकारात्मक गोष्टीही मिळाल्या आहेत, ज्यातून शिकून आम्ही आगामी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू.”