IND beat BAN By 280 Runs and Creates History in Test Cricket: भारतीय संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा तब्बल २८० धावांनी पराभव केला आहे. भारताने बांगलादेशला विजयासाठी ५१५ धावांचे आव्हान दिले होते आणि २३४ धावांवर बांगलादेशला ऑल आऊट करत कसोटी मालिकेत १-० ने आघाडी मिळवली आहे. रविचंद्रन अश्विनच्या ६ विकेट्सच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात एकतर्फी दबाव आणला.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना टीम इंडियाने मोठ्या सहजतेने जिंकला. भारताच्या विजयात आर अश्विनची भूमिका महत्त्वाची होती. आर अश्विनने पहिल्या डावात शतक झळकावत भारताचा डाव सावरला आणि दुसऱ्या डावात विक्रमी ६ विकेट्स घेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

हेही वाचा – VIDEO: रोहितने बोलता बोलता मुद्दाम शुबमनला मारलं, विराटने कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होतंय सांगताच कॅप्टनने पाहा काय केलं?

IND vs BAN 1st Test: भारतीय क्रिकेट संघाने रचला इतिहास

बांगलादेशला हरवून भारताने कसोटी क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. भारतीय क्रिकेट संघाने १९३२ साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून भारताने एकूण ५८० सामने खेळले आहेत. ९२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडियाने पराभवापेक्षा जास्त विजयाचा आकडा गाठला आहे. बांगलादेशचा पराभव करून टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमधील १७९वा विजय संपादन केला आहे. तर, संघाला १७८ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत भारतातील कसोटी क्रिकेटच्या ९२ वर्षांच्या इतिहासात असे घडले नव्हते. भारताने २२२ सामने अनिर्णित खेळले आहेत, तर भारताचा एक सामना रद्द झाला आहे.

हेही वाचा – Video: हात जोडले, कानही धरले, बॅटची पूजा करुन ऋषभ पंत मैदानात उतरला, देवाकडे काय मागितलं?

‘ही’ कामगिरी करणारा भारत ठरला पाचवा संघ

कसोटी क्रिकेटमध्ये पराभवापेक्षा जास्त विजय नोंदवणारा भारत हा जगातील पाचवा संघ ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानच्या संघांनी अशी कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने ८६६ सामन्यांपैकी ४१४ सामने जिंकले आहेत आणि २३२ सामने गमावले आहेत. इंग्लंड संघाने १०७७ सामन्यांपैकी ३९७ सामने जिंकले असून ३२५ सामने गमावले आहेत. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ४६६ कसोटी सामन्यांपैकी १७९ सामने जिंकले आहेत आणि १६१ सामने गमावले आहेत. याशिवाय ४५८ सामन्यांपैकी पाकिस्तानने १४८ सामने जिंकले असून १४४ सामने गमावले आहेत.

हेही वाचा – IND vs BAN : अश्विन अण्णाची फलंदाजीनंतर गोलंदाजीतही कमाल, अनिल कुंबळेचा विक्रम मोडत ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

भारत वि बांगलादेश पहिल्या कसोटीचा लेखाजोखा

दोन्ही संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जिथे टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी उतरली आणि भारताने १४४ धावांवर ६ विकेट गमावल्या. आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने टीम इंडियाला त्या कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं. अश्विनने ११३ धावांची तर जडेजाने ८६ धावांची खेळी खेळली. त्यामुळे टीम इंडियाने पहिल्या डावात ३७६ धावा करता आल्या. दोन्ही खेळाडूंनी टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.

बांगलादेशकडून हसन महमूदने ५ विकेट घेतले. यानंतर बांगलादेशचा संघ फलंदाजीला आला आणि ते १४९ धावांवर सर्वबाद झाले आणि टीम इंडियाला २२७ धावांची आघाडी मिळाली. भारताकडून जसप्रीत बुमराहने त्या डावात सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. २२७ धावांची आघाडी घेऊन भारतीय फलंदाज पुन्हा फलंदाजीसाठी उतरले आणि पुन्हा एकदा टीम इंडियाचा डाव अडचणीत आल्याचे दिसून आले. जेव्हा त्यांनी ६७ धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. यानंतर ऋषभ पंत आणि शुबमन गिल यांनी शतके झळकावली आणि टीम इंडियाची धावसंख्या २८७ धावांपर्यंत नेली. भारताने केवळ ४ विकेट गमावल्या होते.

कर्णधार रोहित शर्माने ५१४ धावांच्या आघाडीसह डाव घोषित केला आणि बांगलादेशला विजयासाठी ५१५ धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ २३४ धावांवर ऑलआऊट झाला आणि टीम इंडियाने २८० धावांनी सामना जिंकला. या डावात अश्विनने भारतासाठी शानदार गोलंदाजी करत २१ षटकांत ८८ धावा देत ६ विकेट घेतले. अश्विनला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. अश्विनचा हे १०वा सामनावीर म्हणून पुरस्कार आहे.