IND vs NZ What Are The 5 Big Reasons of India Defeat: न्यूझीलंडने सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव करत मोठा इतिहास घडवला आहे. न्यूझीलंडने सलग दोन कसोटी सामने जिंकत पहिल्यांदाच भारतात मालिका जिंकली आहे. त्यामुळे भारताला तब्बल १२ वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत होण्याची वेळ ओढवली. न्यूझीलंडविरूद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले सलग दोन सामने किवी संघाने जिंकून मालिकाही आपल्या नावे केली आहे. न्यूझीलंड संघाने सुरूवातीपासूनच उत्कृष्ट कामगिरी करत भारताला सामन्यात फार काळ टिकू दिले नाही. पण भारताच्या या मोठ्या पराभवामागे कोणती कारणं आहेत, जाणून घेऊया.

फिरकी खेळण्यात अपयश

भारतीय संघाचा दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिमयमध्ये खेळवला गेला. येथील खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळते, हे माहितच आहे. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश केला. ज्याने दोन्ही डावात मिळून ११ विकेट्स घेतले. पण भारतीय संघ मात्र फिरकीपटूंविरूद्ध चांगली फलंदाजी करण्यात अपयशी ठरला.

हेही वाचा – WTC Points Table: न्यूझीलंडकडून दारूण पराभवानंतर भारताची बिकट अवस्था, WTC गुणतालिकेतील पहिले स्थान धोक्यात, भारत फायनलला मुकणार?

भारतातील खेळपट्ट्या या फिरकीसाठी अधिक अनुकूल असल्याने भारतीय फलंदाजांना फिरकीविरूद्ध खेळण्याचा चांगला अनुभव आहे, हे सर्वश्रुत आहे. पण या सामन्यात मात्र भारतीय फलंदाज फिरकीविरूद्ध चांगली फलंदाजी करू शकले नाही. पण त्याउलट किवी फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. भारतीय संघ पहिल्या डावात १५६ वर तर दुसऱ्या डावात ऑल आऊट झाला. दोन्ही डावात रवींद्र जडेजाने संघाचा डाव सांभाळला पण इतर सर्व फलंदाज फेल ठरले.

हेही वाचा – Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालने कसोटीत घडवला नवा इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला एकमेव भारतीय फलंदाज

चुकीचे फटके मारणं पडलं महागात

भारतीय संघाची निराशाजनक फलंदाजी दुसऱ्या कसोटीतही पाहायला मिळाली. भारतीय संघाचे फलंदाज संघाला धावांची गरज असताना सांभाळून खेळण्यापेक्षा मोठे फटके मारण्याकडे त्यांचा कल होता. यादरम्यान बरेचसे खेळाडू नको ते फटके मारण्याच्या नादात झटपट बाद झाले. भारतीय फलंदाजी बाजू या कसोटी सामन्यात पूर्ण ढासळताना दिसली. सर्फराझ खान, ऋषभ पंत यांचे पहिल्या डावातील काही खराब शॉट खेळून त्यावर बाद होणं भारतासाठी महागात पडलं.

हेही वाचा – Jemimah Rodrigues : आम्ही धार्मिक कार्यक्रम आयोजित केले पण धर्मांतर वगैरे काहीही नव्हतं, जेमिमाच्या वडिलांचं स्पष्टीकरण

वेळ काढून खेळण्याची हातोटी नाही

कसोटी सामना हा पाच दिवस खेळवला जातो, त्यामुळे धावा काढण्याबरोबरच मैदानात फलंदाजाने फार काळ टिकून राहणं, सेट होणं ही तितकंच महत्त्वाचं असतं. सेट झाल्यानंतर फलंदाज आपल्या फलंदाजी कौशल्याने चांगली फटकेबाजी करत आपला डाव पुढे नेऊ शकतो. जेणेकरून प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर दडपण येईल. पण भारतीय फलंदाज बचावात्मक फलंदाजी न करता संयमाने न खेळता बाद झाले. खराब शॉट्स, चेंडू समजून न घेता फटके खेळणं भारताला भारी पडलं. परिणामी भारतीय संघ झटपट सर्वबाद झाला आणि तिसऱ्या दिवशीच संघाला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. भारतीय फलंदाज अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत, याचा त्यांना फटका बसला आहे.

न्यूझीलंडच्या तुलनेत भारताचे फिरकीपटू निष्प्रभ

न्यूझीलंड संघाचे फिरकीपटू मिचेल सँटनर, एजाज पटेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी भारतीय खेळाडूंवर चांगलाच वचक बसवला आणि आपल्या फिरकीच्या जोरावर २० विकेट्समधील १९ विकेट्स घेतले. पण मिचेल सँटनरच्या फिरकीने भारतीय फलंदाजांना सर्वात जास्त त्रास दिला. सँटरनने दोन्ही डावात मिळून १३ विकेट्स घेतल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरेनही चांगली कामगिरी केली. पण न्यूझीलंडच्या फिरकीपटूंच्या तुलनेत भारताचे फिरकीपटू निष्प्रभ ठरले. भारताच्या फिरकीपटूंनी विकेट्स घेतल्या पण त्यांना धावांवर अंकुश ठेवता आला नाही. तर किवी संघाच्या फिरकीपटूंनी धावांवर अंकुश ठेवत भारताला एकेक धाव घेण्यासाठी तरसवले.

भारताचे वरिष्ठ खेळाडू फेल

भारतीय संघाचे सिनियर खेळाडू या सामन्यात फेल झाले. भारताचे सिनियर फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्माने या सामन्यात फिरकीपटूंसमोर सपशेल गुडघे टेकले. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने तर या दुसऱ्या कसोटी सामन्यात सर्वांनाच निराश केले. पहिल्या डावात रोहित शर्मा शून्यावर बाद झाला तर दुसऱ्या डावात ८ धावा करत सँटरनचा बळी ठरला. पहिल्या डावात तर टीम साऊदीने त्याला क्लीन बोल्ड करत मोठा धक्का दिला. तर विराट कोहलीनेही सर्वांना बॅटने निराश केले. पहिल्या डावात विराट कोहली एक धाव घेत सँटरनच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. ज्या चेंडूवर विराट षटकार आणि चौकार लगावत असे त्याच चेंडूवर तो त्रिफळाचीत झाल्याने त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तर रोहित-विराटनंतर जसप्रीत बुमराहही गोलंदाजीत फार काही खास करू शकला नाही. बुमराहला या कसोटीत एकही विकेट घेता आली नाही.