दोन सलग पराभवांमुळे एकीकडे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रयत्नशील असताना सोमवारी संघ व्यवस्थापनाच्या एका धक्कादायक निर्णयामुळे साऱ्यांनाच आश्चर्यचकित केले. संघ व्यवस्थापनाच्या आज्ञांचे पालन न केल्याप्रकरणी हा आसूड उगारण्यात आला असून, उपकर्णधार शेन वॉटसनसह तीन अव्वल खेळाडूंची तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.
हैदराबादच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाने एक डाव आणि १३५ धावांनी मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना वैयक्तिक आणि सांघिक कामगिरी कशी उंचावेल, याचे सादरीकरण करायला सांगितले होते. परंतु अष्टपैलू वॉटसन, फलंदाज उस्मान ख्वाजा, वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सन आणि मिचेल जॉन्सन हे चार खेळाडू सादरीकरण करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच सादरीकरण न केल्याबद्दल या चौघांवर संघातून वगळण्याची नामुष्की ओढवली आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-२ अशा फरकाने पिछाडीवर आहे. यातच यष्टीरक्षक-फलंदाज मॅथ्यू वेड दुखापतीमुळे मायदेशी परतणार असल्याचे वृत्त ताजे असतानाच या चार खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघ निवड करताना ऑस्ट्रेलियाकडे फक्त १३ खेळाडूच उपलब्ध असतील.
‘‘चार खेळाडूंना संघाची शिस्त पाळता आली नाही, त्यामुळे दुर्दैवाने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. जगातील सर्वोत्तम संघ म्हणून ऑस्ट्रेलियाचा रूबाब आहे. जेव्हा हा संघ जगातील सर्वोत्तम संघ असतो, तेव्हा वागणुकीद्वारेसुद्धा हा आदर्शवाद जोपासता यायला हवा,’’ असे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी सांगितले. ‘‘ते चार खेळाडू माझ्या अपेक्षांची पूर्तता करू शकले नाही. त्यामुळे आगामी कसोटी सामन्यासाठी त्यांची निवड करता येणार नाही,’’ असे स्पष्टीकरण त्यांनी पुढे दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा