IND vs BAN Men’s T20 Match Highlights: भारत वि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. भारतीय संघाने या सामन्यात टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २९७ धावा केल्या आहेत. यासह भारताने कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या संघाविरूद्ध सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. संजू सॅमसनने टी-२० क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले तर सूर्यकुमार यादवने शानदार ७५ धावा केल्या. सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनने उत्कृष्ट भागीदारी रचत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. यानंतर हार्दिक पंड्या ४७ धावा आणि रियान पराग ३४ धावा यांनी भारताचा डाव पुढे नेला. तर रिंकू सिंगने अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत भारताला २९७ धावांवर नेऊन ठेवले. त्यानंतर बांगलादेशचा संघ १३३ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक ३ विकेट घेतले. संजू सॅमसनला सामनावीर आणि हार्दिक पंड्याला संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
India vs Bangladesh 3rd T20 Match Highlights : भारत वि बांगलादेश तिसऱ्या टी-२० सामन्याचे हायलाईट्स
भारत-बांगलादेश तिसऱ्या टी-२० सामन्याची नाणेफेक भारताने जिंकली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बांगलादेशचा संघ गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार आहे. दोन्ही संघांनी प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादवने अर्शदीपच्या जागी रवी बिश्नोईला संघात संधी दिली आहे.
भारत-बांगलादेश तिसऱ्या टी-२० सामना हैदराबादमध्ये खेळवला जात आहे. सामना सुरू होण्यापूर्वी पावसाने हजेरी लावली होती. पण आता पाऊस थांबला असून मैदानावरील कव्हर हटवण्यात येत आहेत. त्यामुळे सामन्याची नाणेफेक वेळेत होणार आहे.
फिरकीपटू रवी बिश्नोई आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांना तिसऱ्या टी-२० सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. दोघांनी अद्याप या मालिकेत एकही सामना खेळलेला नाही.
बांगलादेशचा दिग्गज खेळाडू महमुदुल्लाहचा हा शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना असेल. त्याने संघासाठी सर्वाधिक १४१ टी-२० सामने खेळले आहेत. भारत बांगलादेश दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी महमुदुल्लाहने पत्रकार परिषदेत निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले.
३ सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-० ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताचे लक्ष्य निर्भेळ विजयावर असेल. पण या दुसऱ्या टी-२० सामन्यावर पावसाचे सावट आहे. ४० टक्के पावसाची शक्यता आहे.
भारत-बांगलादेशमधील तिसरा टी-२० सामना हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. तिलक वर्मा आणि नितीशकुमार रेड्डी हे दोघेही मूळचे हैदराबादचे असून त्यांच्या घरच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे.