Virat Kohli Fails to Take DRS After Dismissal in IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावातही विराट कोहली स्वस्तात बाद झाला. पहिल्या डावात विराटने ६ धावा केल्या तर दुसऱ्या डावात विराट कोहली १७ धावा करत बाद झाला. पण दुसऱ्या डावात विराट कोहलीने अशी काही चूक केली की ज्याचा टीम इंडियाला फटका बसला आहे. विराट कोहलीला मैदानावरील पंचांनी बाद दिल्यानंतर रिव्ह्यू करण्याची संधी होती, पण त्याने रिव्ह्यू घेतला नाही आणि प्रतिस्पर्धी संघाला विकेट भेट म्हणून दिली. मात्र, दुसऱ्या डावात त्याने १७ धावा करत घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२ हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला.

हेही वाचा – Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चारशे पार; कपिल देव, शमी, झहीर यांच्या मांदियाळीत पटकावले स्थान

विराट कोहलीने बाद दिल्यावर रिव्ह्यू न घेता केला मोठी चूक

पहिल्या डावात फ्लॉप ठरल्यानंतर विराट कोहलीला दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती आणि तो क्रीजवर स्थिरावला होता. ३७ चेंडूंचा सामना करताना कोहलीने २ चौकारांच्या मदतीने १७ धावा केल्या होत्या आणि तो हळूहळू डाव पुढे नेत होता, पण दुसऱ्या डावातील २०व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो मेहदी हसन मिराजच्या चेंडूवर पायचीत झाला. कोहलीने मिराजचा चेंडू ऑन-साईडच्या दिशेने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या डाव्या पायाच्या पॅडला लागला. यानंतर गोलंदाजासह सर्वांनीच जोरदार अपील केले आणि अंपायरने त्याला बाद घोषित केले.

हेही वाचा – ENG vs AUS: ट्रेव्हिस हेडने विक्रमी खेळीसह मोडला रोहित शर्माचा वनडेमधील मोठा विक्रम, ‘बॅझबॉल’चाही उडवला धुव्वा

विराट कोहलीने रिव्ह्यू न घेतल्याने रोहित शर्मा वैतागला

कोहलीही यानंतर दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या शुबमन गिलशी रिव्ह्यूबद्दल बोलायला आला, मात्र गिलला खात्री नव्हती आणि त्यानंतर कोहलीने रिव्ह्यू घेतला नाही आणि मैदानाबाहेर निघून गेला. कोहलीच्या पॅडवर चेंडू आदळण्यापूर्वी त्याच्या बॅटला लागला होता, असे नंतर रिप्लेमध्ये दिसून आले. रिप्ले पाहिल्यानंतर रोहित शर्माही नाराज दिसत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट असं जाणवत होतं की विराट कोहलीने रिव्ह्यू घेतला पाहिजे होता. तर स्क्वेअर लेगवर उभे असलेले अंपायर रिचर्ड केटलबरो यांनी मोठ्या स्क्रीनवर रिप्ले पाहिल्यानंतर एक वेगळीच स्माईल दिली. कोहलीने रिव्ह्यू घेतला असता तर तो नाबाद राहिला असता आणि त्याला मोठी खेळी खेळता आली असती.

हेही वाचा – Virat Kohli: विराट कोहलीने चेन्नई कसोटीत घडवला इतिहास, सचिन तेंडुलकरनंतर ‘ही’ कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज

विराट कोहलीच्या विकेटनंतर ऋषभ पंत आणि शुबमन गिल भारताचा डाव सांभाळत आहेत. भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ बाद ८१ धावा केल्या आहेत आणि भारताकडे एकूण ३०८ धावांची आघाडी आहे. ऋषभ पंत १२ धावा तर शुबमन गिल ३३ धावा करत मैदानात कायम आहेत. हे दोघेही उद्या भारताच्या डावाची सुरूवात करतील.