Pune Pitch Record India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडिया १-० ने पिछाडीवर आहे. दुसरीकडे, पुणे कसोटीतही टीम इंडियाची स्थिती बिकट झाली आहे. दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा फटका बसण्याची मोठी शक्यता आहे.

पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने न्यूझीलंडला २५९ धावांवर ऑलआउट केले होते. तर भारतीय संघ पहिल्या डावात १५९ धावा करत सर्वबाद झाला. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५ विकेट्स गमावत ३०१ धावांची आघाडी मिळवली आहे. अशारितीने टीम इंडियाची अवस्था न्यूझीलंडपेक्षा वाईट असल्याचे दिसून आले. आता टीम इंडियाचा ७ वर्ष जुना विक्रम अधिक ताण वाढवणारा आहे. त्यामुळे टीम इंडियावर पराभवाचा धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा – IND vs NZ: विराट कोहली आणि टीम साऊदी खरंच एकमेकांशी भांडत होते का? अंपायरसमोरचा ‘तो’ VIDEO व्हायरल

न्यूझीलंड संघाकडे ३०० अधिक धावांची आघाडी आहे तर त्यांच्याकडे अजून ५ विकेट्सही शिल्लक आहेत. त्यामुळे संघ किती धावांची आघाडी मिळवणार, हेही पाहण्यासारखं आहे. या मैदानावर यापूर्वी दोन कसोटी सामने खेळवले गेले होते, या दोन्ही सामन्यांचा रेकॉर्ड पाहता टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.

पुण्याच्या मैदानावर भारताचा सामना २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरूद्ध झाला होता. या सामन्यात भारताची कामगिरी फारच खराब होती. भारतीय संघ पहिल्या डावात १०६ धावांवर सर्वबाद झाला तर दुसऱ्या डावात १०७ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने तब्बल ३३३ धावांनी भारतावर मोठा विजय मिळवला होता.

हेही वाचा – Washington Sundar: घरच्यांनी का ठेवलं ‘वॉशिंग्टन’ हे नाव? वॉशिंग्टन सुंदरच्या नावामागची काय आहे नेमकी कहाणी?

२०१७ मध्ये पुण्यातील याच मैदानावर झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ २६० धावांवर ऑलआऊट झाला. यानंतर टीम इंडिया या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये अवघ्या १०५ धावांवर ऑल आऊट झाली. विशेष म्हणजे या सामन्याच्या पहिल्या डावातही विराट कोहली शून्यावर बाद झाला होता. त्यावेळी कोहली टीम इंडियाचा कर्णधार होता.

यानंतर भारताचा दुसरा सामना २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरूद्ध झाला होता. या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला होता. या सामन्यात विराट कोहलीच्या २५४ धावांच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि १३७ धावांनी मोठ्या विजयाची नोंद केली होती. त्यामुळे हे दोन्ही सामने पाहता पुण्याच्या या मैदानावर एकतर संघ मोठा ऐतिहासिक विजय मिळवू शकतो किंवा संघाला एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे हा रेकॉर्ड पाहता भारतावर पराभवाचा धोका आहे.