PCB Schedule IND vs PAK Match for 1 March in Lahore: भारत विरूद्ध पाकिस्तानचा सामना हा क्रिकेट विश्वातील एक हायव्होल्टेज सामना असतो. आयसीसी टूर्नामेंटमध्ये एकदा वगळता टीम इंडियाने प्रत्येक वेळी पाकिस्तानला नमवले आहे. अलीकडेच, टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला. दरम्यान, या दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा ही मोठी लढत पाहायला मिळणार आहे. पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील सामन्याबाबत पीसीबीने वेळापत्रक तयार केले असून भारत पाकिस्तान सामन्याची तारीखही निश्चित केली आहे.

हेही वाचा – मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल

पाकिस्तानमध्ये होणार चॅम्पियन्स ट्रॉफी

पाकिस्तान क्रिकेट बोर्डने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या वेळापत्रकाचा मसुदा तयार केला आहे आणि तो आयसीसीला सादर केला आहे. यावेळी पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद मिळाले आहे. पीसीबीने या वेळापत्रकात १ मार्च २०२५ रोजी लाहोरमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्धचा चॅम्पियन्स ट्रॉफी सामना निश्चित केला आहे. मात्र, त्यात सहभागी होण्यासाठी आणि टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास बीसीसीआयने अद्याप संमती दिलेली नाही.

पीसीबीच्या म्हणण्यानुसार, ही स्पर्धा १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत होणार आहे. १० मार्च हा राखीव दिवस आहे. म्हणजेच अंतिम फेरीसाठी आणखी एक दिवस ठेवण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांना टी-20 विश्वचषक फायनलसाठी बार्बाडोसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, त्यांनी १५ सामन्यांचे वेळापत्रक आयसीसी समोर सादर केले आहे. या वेळापत्रकातील भारतीय संघाचे सर्व सामने सुरक्षेच्या कारणास्तव लाहोरमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – Rohit Sharma: “उद्या संध्याकाळी मरीन ड्राईव्हला…”, रोहित शर्माकडून क्रिकेटरसिकांना वर्ल्डकप विजयाच्या सेलिब्रेशनचं निमंत्रण

आयसीसी बोर्डाच्या एका सदस्याने पीटीआयला सांगितले की पीसीबीने १५ सामन्यांच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा मसुदा सादर केला आहे. त्यानुसार लाहोरमध्ये ७, कराचीमध्ये ३ आणि रावळपिंडीमध्ये ५ सामने खेळवले जातील. चॅम्पियन्स ट्रॉफी कराचीमध्ये सुरू होईल, तर दोन उपांत्य फेरीचे सामने कराची आणि रावळपिंडी येथे होतील. तर अंतिम सामना लाहोर येथे होणार आहे.

भारत-पाकिस्तान एकाच गटात

भारताचे उपांत्य फेरीसह सर्व सामने लाहोरमध्ये होणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दोन गट करण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तानला अ गटात ठेवण्यात आले आहे. या दोन संघांशिवाय बांगलादेश आणि न्यूझीलंड हे संघही आहेत. ब गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. अलीकडेच, आयसीसीचे इव्हेंट प्रमुख ख्रिस टेटली यांनी इस्लामाबादमध्ये PCB चेअरमन मोहसिन नक्वी यांची भेट घेतली.

हेही वाचा – “तो कधी सीमारेषेजवळ नसतो पण…”, सूर्यकुमारचा फायनलमधील कॅचबद्दल मोठा खुलासा; म्हणाला, “रोहितकडे चेंडू फेकणार होतो”

पाकिस्तानने २०२३ मध्ये आशिया चषक सामन्यांचे आयोजन केले होते, जो हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळवला गेला होता. या आशिया चषकतील भारताचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते. भारत सरकारने खेळाडूंना पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने हे करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय वगळता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या देशांच्या सर्व बोर्ड प्रमुखांनी, त्यांनी त्यांच्या वेळापत्रक मसुद्याचे समर्थन करण्याचे आश्वासन दिले आहे. यानंतर आता बीसीसीआय भारत सरकारबरोबर चर्चा करून काय निर्णय घेणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.