बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील सर्वोत्तम सांघिक कामगिरीसाठी देण्यात येणारा नोना गाप्रिंदाश्वाली फिरता करंडक भारताने दोन वर्षांपूर्वी जिंकला होता; मात्र भारताकडून हा करंडक हरवला आहे. जागतिक बुद्धिबळ महासंघाने हा करंडक परत करण्याची आठवण केल्यावर शोधाशोध सुरू झाली; पण त्यात अपयश येत असल्यामुळे पर्यायी करंडक तयार होत असल्याचे भारतीय बुद्धिबळ महासंघातील सूत्रांनी शनिवारी सांगितले.

दोन वर्षांपूर्वी चेन्नईत बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन केले होते. त्यातील खुल्या; तसेच महिला विभागात भारताने कांस्य पदक जिंकले होते. या ऑलिम्पियाडमध्ये सर्वांगीण कामगिरी करणाऱ्या संघास गाप्रिंदाश्वाली फिरता करंडक देण्यात येतो. भारतास हा करंडक देण्यात आला. त्या वेळी तत्कालीन भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तो जल्लोषात स्वीकारला.

हेही वाचा – Chess Olympiad 2024: चेस ऑलिम्पियाडमध्ये भारतीय पुरूष संघाची ऐतिहासिक कामगिरी, डी. गुकेश, अर्जुन यांच्या बळावर पहिले सुवर्णपदक केले निश्चित

काही महिन्यांपूर्वी भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या निवडणुकीत पूर्णपणे नवी कार्यकारीणी निवडून आली. या कार्यकारीणीस अजूनही तो फिरता करंडक भारतातच आहे, हे जागतिक बुद्धिबळ महासंघाने याबाबत पत्र पाठवल्यावर समजले. त्या पत्रात हा विजेतेपदाचा फिरता करंडक सध्या ऑलिम्पियाड होत असलेल्या हंगेरीत घेऊन येण्याची सूचना करण्यात आली होती.

जागतिक महासंघाच्या पत्रानंतर भारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या करंडकाचा शोध सुरू केला. महासंघाच्या दिल्ली; तसेच चेन्नई कार्यालयात तपासणी करण्यात आली. तमिळनाडू संघटना, त्या वेळी ऑलिम्पियाडच्या संयोजनात सहभाग असल्यामुळे तमिळनाडू सरकार, भारतीय संघातील खेळाडू, पदाधिकारी, मार्गदर्शक यांना विचारणा करण्यात आली. मात्र, प्रत्येकाने आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. काही भारतीय खेळाडूंनी तर या करंडकास आम्ही कधीही स्पर्श केलेला नाही आणि त्या दिवसाच्या बक्षिस समारंभानंतर कधीही पाहिलेला नाही, असेही नमूद केले.

हेही वाचा – VIDEO: रोहितने बोलता बोलता मुद्दाम शुबमनला मारलं, विराटने कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होतंय सांगताच कॅप्टनने पाहा काय केलं?

भारतीय बुद्धिबळ महासंघाने याबाबत पोलिस तक्रारही केली आहे. दरम्यान, भारताने करंडक मिळत नसल्याचे जागतिक महासंघास कळवले आहे. मूळ करंडकासारखा दिसणारा नवा करंडक आता विजेत्या संघास देण्यात येईल, असा निर्णय झाला असल्याचे भारतीय बुद्धिबळ महासंघातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ‘जागतिक महासंघाने पत्र पाठवल्यानंतर आम्ही करंडकाचा सर्वत्र शोध घेतला. अजूनही तो मिळालेला नाही. ही नक्कीच लाजीरवाणी परिस्थिती आहे. हा करंडक सांभाळून ठेवण्याची जबाबदारी कोणाची हे नक्कीच स्पष्ट असायला हवे,’ असेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

तूर्तास बदली करंडक देण्याचे ठरले आहे. त्यासाठीची ऑर्डरही नोंदवण्यात आली आहे. आता तयार करण्यात येणारा करंडक हा मूळच्या करंडकासारखाच असेल. हे जे काही घडले, त्याबाबत माफी मागण्यासाठी शब्द नाहीत, असेही त्यांनी सांगितले. सध्या सुरू असलेल्या उन बुद्धिबळ ऑलिम्पियाडची सांगता आज, २२ सप्टेंबर रविवारी होणार आहे.