टीम इंडियाचा माजी कसोटी सलामीवीर मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. मुरली विजयने ट्विटरच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली. ३८ वर्षीय मुरलीने भारतासाठी एकूण ६१ कसोटी आणि १७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. मुरली विजयने ६ नोव्हेंबर २००८ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता.
मुरली विजयने डिसेंबर २०१८ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून तो टीम इंडियामध्ये परत येऊ शकला नाही. मुरली विजयने १०५ कसोटी डावांमध्ये ३८.२८च्या सरासरीने एकूण ३९८२ धावा केल्या आहेत. त्याच्या खात्यात १२ शतके आणि १५ अर्धशतके आहेत. त्याच वेळी, मुरलीने १७ एकदिवसीय सामन्यांमध्ये २१.१८च्या सरासरीने एकूण ३३९ धावा केल्या आहेत.
मुरली विजय म्हणाला की, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करत आहे, पण क्रिकेट विश्वात नव्या संधींच्या प्रयत्नात असणार आहे. भविष्यातही क्रिकेटमध्ये आव्हान कायम ठेवणार असल्याचे मुरली विजयने सांगितले. क्रिकेटपटू म्हणून आपल्यासाठी ही नवीन प्रवासाची सुरुवात असेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
मुरलीने आपल्या निवेदनात लिहिले की, ”२००२ ते २०१८ हा काळ माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ होता. एवढ्या मोठ्या स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
हेही वाचा – IND vs AUS: दिनेश कार्तिकने कॉफीच्या पॅकेट्सवरुन मार्नस लाबुशेनची घेतली फिरकी; म्हणाला, ‘अरे मित्रा…’
मुरलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन (टीएनसीए), चेन्नई सुपर किंग्ज आणि केमप्लास्ट सनमार यांचे आभार मानले. याशिवाय त्याने सहकारी खेळाडू आणि प्रशिक्षकांचेही आभार मानले.
विजय म्हणाला, “माझ्या सर्व सहकारी, प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि सपोर्ट स्टाफचे आभार, तुम्हा सर्वांसोबत खेळणे हे एक सौभाग्य होते. माझे स्वप्न सत्यात बदलण्यात मला मदत केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. ज्या क्रिकेट चाहत्यांनी आंतरराष्ट्रीय खेळाच्या चढ-उतारात मला साथ दिली आहे. ते मी तुमच्या सर्वांसोबत घालवलेले क्षण नेहमी लक्षात ठेवेल आणि तुमचा पाठिंबा माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे.”