Asha Sobhana dropped catches during IND W vs PAK W Match : महिला टी-२० विश्वचषक २०२४ मधील सातवा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारताने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६ विकेट्सनी पराभव करत विजयाचे खाते उघाडले. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात भारताला खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसला होता. तसेच आज झालेल्या सामन्यात भारताकडून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. या सामन्यात आशा शोभनाने दोन झेल सोडले, ज्यामुळे तिच्यावर चाहत्यांकडून टीका होत आहे.

पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यामुळे पाकिस्तानविरुद्धचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकणे आवश्यक होते. तर पाकिस्तानने पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता. पहिल्या सामन्याप्रमाणे यावेळीही टीम इंडियाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरावे लागले. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. मात्र, क्षेत्ररक्षणात आशा शोभनाकडून दोन चुका झाल्या. आशा शोभनाने दोन झेल सोडले, योगायोगाने दोन्ही वेळा गोलंदाज एकच होता.

आशाने केले अतिशय खराब क्षेत्ररक्षण –

या सामन्यातआशा शोभनाने दोन झेल सोडले आणि दोन्ही वेळा अरुंधती रेड्डी ही दुर्दैवी गोलंदाज होती. सातव्या षटकात, भारतीय वेगवान गोलंदाजाच्या दुसऱ्या चेंडूवर मुनिबा अलीने स्कूप शॉट खेळला, पण आशाला शॉर्ट फायनल लेगवर तिचा झेल पकडता आला नाही. मात्र, त्याच षटकात ओमाइमा सोहेलला बाद करून अरुंधतीला थोडा दिलासा मिळाला. श्रेयंका पाटीलने लवकरच मुनिबाला तंबूत पाठवले. यानंतरही आशाने एक सोपा झेल सोडला.

हेही वाचा – IND vs BAN : सूर्याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने फडकावली विजयी पताका, बांगलादेशचा ७ विकेट्सनी उडवला धुव्वा

आशा शोभनावर चाहते संतापले –

आशा शोभनाने सोपे झेल सोडल्याने चाहत्यांचा पारा वाढला आणि त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त होताना तिच्यावर टीका केली. साहजिकच असे क्षेत्ररक्षण पाहून कोणालाही राग येऊ शकते. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी तिच्यावर टीका केली. एका यूजरने तर ‘एक्स’ वर लिहिले की, अशा खराब क्षेत्ररक्षणासाठी तुरुंगात टाकले पाहिजे,

तर दुसऱ्याने लिहिले की, क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सामने आणि स्पर्धा जिंकल्या जातात.

भारतीय संघ विजयानंतर चौथ्या स्थानावर पोहोचला –

अ गटातील गुणतालिकेवर नजर टाकली तर भारतीय संघ या विजयासह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या खात्यात दोन गुण आहेत. तथापि, त्याचा निव्वळ धावगती -१.२१७ आहे. आता भारतीय संघाला ९ ऑक्टोबरला याच मैदानावर श्रीलंकेविरुद्ध पुढील सामना खेळायचा आहे. त्याचबरोबर या पराभवाचा पाकिस्तानवर फारसा परिणाम झालेला नाही. फातिमा सनाचा संघ सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्या खात्यात दोन गुण आहेत आणि निव्वळ धावगती +०.५५५ आहे. न्यूझीलंड अव्वल तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर श्रीलंकेचा संघ शेवटच्या स्थानावर पोहोचला आहे.