मुंबई इंडियन्सच्या पाठी चिकटलेले पराभवाचे शुक्लकाष्ठ संपायला तयार नाही. शुक्रवारी घरच्या मैदानावर म्हणजे वानखेडेवर केकेआरविरोधात मुंबई इंडियन्सला या हंगामातील आठवा आणि सलग चौथा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आता अडचणी निर्माण झाल्या आहेत. शुक्रवारी वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला जिंकण्याची पूर्ण संधी होती. मात्र सामन्यात घेतलेले काही आश्चर्यकारक निर्णय आणि ढिसाळ फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सचा पराभव झाला, असे विधान भारताचा माजी जलदगती गोलंदाज इरफान पठाणने म्हटले आहे. तसेच कालच्या सामन्यात हार्दिकची चूक लक्षात आणून देताना पठाणने काही मोठी विधाने केली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रथम फलंदाजी करताना केकेआर संघाने १७० धावांचे आव्हान दिले होते. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संघ १४५ धावांवरच गडगडला. केकेआरकडून गोलंदाजीत मिचेल स्टार्कने ४ तर आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेनने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. केकेआर संघाने या विजयासह १२ वर्षांनंतर मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्यात यश मिळवले आहे.

IPL 2024: “आता बोलण्यासारखं माझ्याकडे फार काही नाही…” मुंबईच्या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार पंड्या नेमकं काय म्हणाला?

मुंबई इंडियन्सकडून सुर्यकुमार यादव (५६ धावा) वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा, कर्णधार हार्दिक आणि इतर फलंदाज फारसी चमक दाखवू शकले नाहीत. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर इरफान पठाणने सांगितले की, हार्दिक पंड्याने गोलंदाजी करताना घेतलेले काही निर्णय यासाठी कारणीभूत आहेत. तसेच संघाकडून हार्दिक पंड्याला आदर मिळत नसल्याचाही दावा पठाणने केला.

पहिल्यांदा फलंदाजी करत असताना केकेआरच्या ५७ धावांवरच ५ विकेट पडल्या होत्या. सामन्यात इतकी चांगली आघाडी घेतल्यानंतर पंड्याने नमन धीरच्या हाती चेंडू दिला. नमन धीरने लागोपाठ दोन ओव्हर टाकल्या, ज्यात त्याने अनुक्रमे ८ आणि ११ धावा दिल्या. मात्र हार्दिक पंड्याच्या या निर्णयामुळे वेंकटेश अय्यर आणि मनिष पांडे यांना भागीदारी रचण्याची मोकळीक मिळाली, असा आरोप इरफान पठाणने केला आहे. जर या क्षणाला संघाच्या मुख्य गोलंदाजांच्या हाती चेंडू दिला असता तर आणखी काही विकेट मिळण्याची किंवा दबाव वाढण्याची शक्यता होती, असे पठाणने सांगितले.

IPL 2024: IPL 2024: मुंबई इंडियन्स प्लेऑफमधून बाहेर? केकेआरविरूद्धच्या पराभवानंतर कसं आहे समीकरण…

एक्स वर इरफान पठाणचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये पठाण मुंबई इंडियन्सच्या संघावर आणि पंड्यावर टीका करताना दिसतो. “मुंबईची कहाणी इथे संपली. हा संघ कागदावर अतिशय चांगला दिसतो. पण मैदानात तशी खेळी होत नाही. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात येतो, जो योग्य वाटतो. जेव्हा तुम्ही ५७ धावांवर ५ विकेट घेता तेव्हा नमन धीरकडून लागोपाठ तीन ओव्हर करण्यामागचा विचारच कळत नाही. तुम्ही जर मुख्य गोलंदाजांना चेंडू दिला असता तर कदाचित परिणाम वेगळे दिसले असते. तुम्ही वेंकटेश अय्यर आणि मनिष पांडेला ८३ धावांची भागीदारी रचण्याची संधी दिली.”

“क्रिकेटमध्ये कर्णधारपद महत्त्वाचे असते. मुंबई इंडियन्सचा संघ एकसंघ दिसत नाही. त्यामुळे पुढे जाऊन याचा विचार करावा लागेल. सर्वांना एकत्र आणावे लागेल आणि सर्व खेळाडूंनी कर्णधाराला स्वीकारावे लागेल आणि त्याला आदर द्यावा लागेल”, असेही इरफान पठाणने सांगितले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irfan pathan launches fresh attack on hardik pandya after mis 8th ipl 2024 defeat kvg