Rohit Sharma Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा हा मुंबईचा संघ सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आयपीएलमध्ये हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावर नाखूश असल्याने २०२४ च्या हंगामानंतर मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार, अशी चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे. न्यूज १८ स्पोर्ट्सने मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंच्या हवाल्याने बातमीत देताना ड्रेसिंग रुममधील वातावरणही चांगले नसल्याचे म्हटले आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि संघाचे कर्णधारपद हा मोठा चर्चेचा विषय आहे आणि अनेक वेबसाईट्सनी यासंदर्भात वृत्त दिलं आहे. मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापन तसंच रोहित शर्मा यांनी यासंदर्भात अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. मुंबई इंडियन्सचा संघ चार दिवसांसाठी जामनगर इथे आहे.
न्यूज 24 च्या रिपोर्टनुसार, ‘रोहित हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वावर नाराज असल्याने मुंबईचा संघ सोडणार असे म्हटले आहे. ज्यामुळे ड्रेसिंग रूममध्येही मतभेद निर्माण झाले आहेत. या दोन्ही खेळाडूंचे मैदानावरील अनेक निर्णयांवर एकमत होत नसल्याने त्याचा थेट परिणाम संघाच्या कामगिरीवर होत आहे. तसेच एमआयच्या ड्रेसिंग रूममधील वातावरणावरही यामुळे पूर्वीसारखे राहिलेले नाही.’ हार्दिकच्या नेतृत्त्वाखाली मुंबई संघाची कामगिरीही घसरली आहे. ज्यामुळे हार्दिक पांड्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. मुंबई संघाने या मोसमात आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. तिन्ही सामन्यांदरम्यान प्रेक्षकांनी प्रेक्षकांनी हार्दिक पंड्याची हुर्यो उडवली.
३६ वर्षीय रोहित, २०११ पासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. ९.२ कोटी खर्चून त्याला २०११ मध्ये मुंबई संघाने आपल्या ताफ्यात दाखल केले. आतापर्यंत झालेल्या २०१ सामन्यांमध्ये त्याने ५११० धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबई संघाने आयपीएलची पाच जेतेपद पटकावली असे असूनही, मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवले.
IPL 2024 मधील गुजरात टायटन्स विरूद्धच्या संघाच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील तणाव स्पष्ट दिसत होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या त्या सामन्यात हार्दिक आणि रोहित अनेक वेळा संवाद साधताना दिसले. पण संघातील वातावरण फारसे चांगले दिसत नव्हते. हार्दिकला फ्रँचायझीचा नवा कर्णधार बनवण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनाही पटलेला नाही आणि याचे पडसाद आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये दिसले आहेत. चाहत्यांनी तिन्ही सामन्यांमध्ये पंड्याची चांगलीच हुर्येा उडवली.