Gautam Gambhir on Virat Kohli : आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि केकेआरचा मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्यात आयपीएलच्या मागील हंगामात जोरदार वादावादी झाली होती. हा वाद लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यादरम्यान झाला होता. मात्र, या हंगामात कोहली आणि गंभीरने उभय संघांमधील सामन्यादरम्यान एकमेकांना मिठी मारली होती, तर गेल्या आठवड्यात ईडन गार्डन्सवर आरसीबी आणि केकेआर यांच्यात झालेल्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे हे दोन महान खेळाडू एकमेकांशी चर्चा करताना दिसले होते. आता गंभीरने कोहलीबरोबरच्या वादावर मौन सोडले आणि सांगितले की, जेव्हा लोकांना मसाला मिळत नाही, तेव्हा ते आमच्याबद्दल बोलू लागतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सर्व टीआरपीचा खेळ आहे’ –

एका स्पोर्ट्स चॅनलवर चर्चा करताना गौतम गंभीर म्हणाला, “हा सर्व टीआरपीचा खेळ आहे. कोहली आणि मी कोणत्या प्रकारचे लोक आहोत याबद्दल मीडियाला काहीच माहिती नाही. प्रसारमाध्यमांना केवळ ‘हाईप’ निर्माण करायचा असतो, पण ‘हाईप’ सकारात्मक पद्धतीनेही निर्माण करता येतो. लोकांना मसाला मिळाला नाही हे मी कोहलीच्या मताशी सहमत आहे. मला एवढेच सांगायचे आहे की जेव्हा जे परिपक्व व्यक्ती असतात, तेव्हा मला वाटत नाही की कोणीही त्यांच्यामध्ये यावे किंवा त्यांच्या नात्याबद्दल बोलावे. कारण शेवटी ते त्या दोघांमधील प्रकरण आहे.”

‘कोहलीकडून डान्सिंग मूव्ह्स शिकायला आवडेल’ –

गौतम गंभीरनेही कोहलीच्या नृत्यशैलीचे विनोदी पद्धतीने कौतुक केले. तो म्हणाला, “मलाही हे करायला आवडेल, पण मी एकही ‘डान्सिंग मूव्ह्स’ करू शकणार नाही. मला कोहलीकडून काही शिकण्याची संधी मिळाली, तर ती डान्सिंग मूव्ह्स असेल.”
स्ट्राइक रेटवर गंभीरने कोहलीचा बचाव केला. आयपीएल २०२४ मध्ये ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोहली आघाडीवर असला, तरी त्याच्या स्ट्राईक रेटबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा – विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन टीका करणाऱ्यांना फटकारले; म्हणाला, ‘जे लोक दुसऱ्यावर टीका करतात त्यांनी स्वत:…’

गौतम गंभीर काय म्हणाला?

याबाबत गंभीर म्हणाला, “प्रत्येक खेळाडूची खेळण्याची शैली वेगळी असते. जे मॅक्सवेल करू शकतो, कोहली करू शकत नाही आणि कोहली जे करू शकतो, ते मॅक्सवेल करू शकत नाही. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फलंदाज हवे असतात. जर तुम्ही पहिल्या क्रमांकापासून आठव्या क्रमांकावर सर्व आक्रमक फलंदाज ठेवले, तर तुम्ही ३०० धावा करू शकता, परंतु या स्थितीत संघ ३० धावांवर ऑलआऊट होण्याचा धोका आहे. तुम्ही जिंकता तेव्हा १०० चा स्ट्राईक रेटही चांगला असतो, पण १८० च्या स्ट्राईक रेटनंतरही संघ हरत असेल तर त्यावर कोणी चर्चा करत नाही. हे सत्य आहे.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Talking about virat kohli gautam gambhir said that he would like to learn dancing moves from him vbm
Show comments