आयपीएल २०२४ मधील एक महत्त्वाचा ६० वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात कोलकाता येथे होणार आहे. त्यासाठी जेव्हा दोन्ही संघ स्टेडियममध्ये सराव करीत होते. त्या सरावादरम्यान मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा कोलकाताचा सपोर्टिंग स्टाफ व त्याचा जुना मित्र अभिषेक नायर यांच्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियवर खूप व्हायरल होतोय. यावेळी दोघांमध्ये झालेल्या संभाषणानं एकच खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ केकेआरने पोस्ट केला होता. मात्र, व्हिडीओतील खळबळजनक संभाषण व्हायरल झाल्यानं केकेआरने तो लगेच डिलीट केला. मात्र, अनेकांनी तो व्हिडीओ डाऊनलोड करीत तो पुन्हा व्हायरल केलाय. रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांच्यामधील चर्चा स्पष्टपणे ऐकू येत नाही; पण जेवढं समजतंय त्यातील त्यांची विधानं मुंबई इंडियन्सविषयी खुलासा करणारी आहेत. अभिषेक नायरला रोहित शर्मा नेमकं काय सांगत होता? रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांच्यातील संभाषणाचा हा व्हिडीओ केकेआरने पोस्ट केला होता. त्यामध्ये स्टेडियमवरील प्रेक्षकांचा गोंधळ सुरू आहे. अनेक प्रेक्षक रोहित शर्माच्या नावाचा जयघोष करीत आहेत. या गोंधळामुळे दोघांमधील चर्चा स्पष्टपणे समजत नाहीये; परंतु त्यावरून तो अनेक रहस्ये उघड करीत असल्याचे समजते. अभिषेक नायरबरोबरच्या संभाषणात रोहित म्हणतो, "प्रत्येक गोष्ट बदलत आहे, ते त्यांच्यावर आहे; पण जे काही आहे, ते माझं घर आहे भावा. हे मंदिर आहे ना ते मी बनवलं आहे. भावा माझं काय आहे, हे तर माझं शेवटचं." दरम्यान, अनेकांनी दोघांमधील या संभाषणाचे वेगवेगळे अर्थ काढण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघातून बाहेर पडणार असल्याचीही चर्चा रंगतेय. हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अनेकांनी रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांच्यात मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन पदावरून चर्चा सुरू असल्याचा अंदाज बांधला आहे. https://twitter.com/GOAThitSharma/status/1788976343738089635?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1788976343738089635%7Ctwgr%5E53cd8d67ffcb9539fb655d0fa2af01b7e548bcc9%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-rohit-sharma-and-abhishek-nayar-leaked-conversation-created-a-ruckus-before-the-kkr-vs-mi-match-video-viral-9966088.html दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटने संघाला पाच वेळा आयपीएल जिंकून देणाऱ्या कर्णधार रोहित शर्माच्या जागी यंदा हार्दिक पांड्याला संघाचा नवा कर्णधार बनवले. हार्दिक पांड्याने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. बहुतांश चाहत्यांना हा निर्णय अजिबात आवडला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ ज्या मैदानात खेळायला जातो, त्या मैदानात रोहित शर्माला भरपूर पाठिंबा मिळतो; पण हार्दिक पांड्याची खिल्लीही उडवली जाते. आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांदरम्यान चाहत्यांमध्ये पंड्याबद्दलचा द्वेष इतका वाढला होता की, आयपीएल सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टॉससाठी आला तेव्हा माजी क्रिकेटपटू समालोचक संजय मांजरेकर यांना चाहत्यांना चांगलं वागण्याचा सल्ला द्यावा लागला. मुंबई इंडियन्सची घसरण इतकी झाली आहे की, १२ पैकी आठ सामने गमावून प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा तो पहिला संघ ठरला आहे आणि आता तो पॉइंट टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे.