Ambati Rayudu Mocks RCB After Their Loss In Eliminator : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला पराभवाची कडवट चव चाखावी लागली. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा चार गडी राखून पराभव केला. हा एलिमिनेटर सामना होता. त्यामुळे या पराभवानंतर आता आरसीबीचा आयपीएल २०२४ मधील प्रवासही संपला आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या आरसीबीचा पराभव झाल्यानंतर आता भारताचा माजी फलंदाज अंबाती रायडूने या संघाला खडेबोल सुनावत त्यांची खिल्ली उडवली आहे. एलिमिनेटर सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी न केल्यामुळे त्यांचा पराभव झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने उत्तम गोलंदाजीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (आरसीबी) आठ गडी बाद करीत १७२ धावांवर रोखले. त्यानंतर राजस्थान संघाने सहा गडी गमावून सहा चेंडू राखून एक अतिरिक्त धाव काढून हा सामना जिंकला. हा एलिमिनेटर सामना असल्याने आरसीबीचा संघ या स्पर्धेतून आता बाहेर पडला आहे. आता राजस्थानचा पुढील सामना दुसऱ्या क्वाॅलिफायरमध्ये २४ मे रोजी चेन्नई येथे सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध होणार आहे.

बेंगळुरूविरोधात अंबाती रायडूचे वादग्रस्त विधान

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या आयपीएलमधील पराभवानंतर रायडूने विराट कोहलीच्या संघाची खिल्ली उडवली. सामना संपल्यानंतर स्टार स्पोर्ट्सवरील संभाषणात रायडूने “चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध बेंगळुरूच्या खेळाडूंनी आक्रमक सेलिब्रेशन केले होते. त्यामुळेच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला”, असे वादग्रस्त विधान केले.

पराभवानंतर नीता अंबानी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना नेमकं काय म्हणाल्या? रोहित- हार्दिकचे घेतले नाव; पाहा VIDEO

भारतीय खेळाडूंवर विश्वास ठेवा, समजून घ्या; रायडूचा आरसीबीला सल्ला

रायडू म्हणाला, “आरसीबीने हे समजून घेतले पाहिजे की, ते आक्रमक सेलिब्रेशन करून आयपीएल ट्रॉफी जिंकू शकत नाहीत. चेन्नई सुपर किंग्जला हरवून यश मिळवता येत नाही. ट्रॉफी जिंकण्यासाठी तुम्हाला एक टीम म्हणून ‘प्लेऑफ’मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.

रायडूने सल्ला देत पुढे म्हटले की, आरसीबीला भारतीय खेळाडू आणि भारतीय प्रशिक्षकांवर विश्वास ठेवावा लागेल. ही इंडियन प्रीमियर लीग आहे आणि त्यामध्ये तुम्ही भारतीय खेळाडूंकडे दुर्लक्ष करू शकत नाही. जर तुम्ही सीएसके, केकेआर व एमआयकडे पाहिले, तर त्यांनी भारतीय खेळाडूंवर विश्वास ठेवला, त्यांना चांगले समजून घेतले. त्यामुळेच ते आज या स्पर्धेत इतके यशस्वी ठरले आहेत.”

आयपीएल २०२४ मध्ये कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची सुरवातच चांगली झाली नाही. या संघाने पहिल्या आठपैकी फक्त एकच सामना जिंकला होता. मात्र, त्यानंतर जबरदस्त कमबॅक करीत त्यांनी सलग सहा सामने जिंकून ‘प्लेऑफ’मधील आपले स्थान निश्चित केले. मात्र, आरसीबीला एलिमिनेटर सामन्यामध्ये पराभवाचे तोंड बघावे लागले. त्यामुळे हा संघ स्पर्धेतून बाहेर पडला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You cant win ipll by aggressive celebrations and beating csk ipl 2024 ambati rayudu mocks virat kohlis rcb team after their loss in eliminator sjr