Ishan Kishan appointed captain of Jharkhand team : सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेदरम्यान इशान किशनबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. बराच काळ भारतीय संघातून बाहेर असलेल्या इशान किशनची कर्णधारपदी वर्णी लागली आहे. रणजी संघात परतल्यानंतर त्याला झारखंड संघाचा कर्णधार नियुक्त करण्यात आले आहे.

युवा संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज –

आता १६ सदस्यीय झारखंड संघाचा कर्णधार म्हणून इशान किशन युवा संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. गेल्या मोसमाचा कर्णधार विराट सिंग उपकर्णधार तर कुमार कुशाग्र यष्टिरक्षक असेल. झारखंड आपल्या रणजी करंडक स्पर्धेची सुरुवात एलिट गट ड मध्ये आसामविरुद्ध गुवाहाटी येथे करणार आहे. गेल्या मोसमात झारखंड अ गटात तळापासून तिसऱ्या स्थानावर होता. त्यांनी सातपैकी दोन सामने जिंकले, दोन गमावले आणि तीन सामने अनिर्णित राहिले.

झारखंडच्या निवड समितीचे अध्यक्ष सुब्रतो दास काय म्हणाले?

झारखंडच्या निवड समितीचे अध्यक्ष सुब्रतो दास यांनी ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले की, ‘इशान हा अनुभवी खेळाडू असून त्याला आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. आम्ही तरुण संघ निवडला आहे. सौरभ तिवारी, शाहबाज नदीम आणि वरुण आरोन हे सर्व गेल्या मोसमानंतर निवृत्त झाले. त्यामुळे आम्हाला आमच्या रणनीतीवर पुनर्विचार करावा लागला.’

हेही वाचा – मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसणाऱ्या रोहितच्या लॅम्बोर्गिनीची किंमत किती? कारचा नंबर तर आहे खूपच खास

बीसीसीआयने केंद्रीय करारातून वगळले होते –

इशान किशनला गेल्या मोसमात देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी न झाल्याने भारतीय क्रिकेट बोर्डाच्या केंद्रीय करारातून वगळण्यात आले होते. डिसेंबर २०२२ मध्ये ऋषभ पंतच्या कार अपघातानंतर भारताच्या मर्यादीत षटकाच्या संघात नियमित झालेल्या इशानने गेल्या वर्षी भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ब्रेक घेतला होता. विश्रांतीनंतर तो बीसीसीआयच्या कोणत्याही अधिकृत सामन्यात सहभागी झाला नाही. तो भारतासाठी शेवटचा सामना २०२३ साली एकदिवसीय विश्वचषकात खेळला होता.

हेही वाचा – IND vs BAN : युवा टीम इंडियाने दिल्लीत बांगलादेशचा उडवला धुव्वा, रिंकू-नितीशने झळकावली वादळी अर्धशतकं

झारखंड क्रिकेट संघ:

इशान किशन (कर्णधार), विराट सिंग (उपकर्णधार), कुमार कुशाग्रा (यष्टीरक्षक), नाझिम सिद्दीकी, आर्यमन सेन, शरणदीप सिंग, कुमार सूरज, अनुकुल रॉय, उत्कर्ष सिंग, सुप्रियो चक्रवर्ती, सौरभ शेखर, विकास कुमार, विवेकानंद तिवारी, मनिषी, रवी कुमार यादव आणि रौनक कुमार.