बांगलादेश आणि भारत यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना बुधवार १४ डिसेंबर २०२२ रोजी चट्टोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर सुरू झाला आहे. या कसोटीसाठी भारताचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल (२२) आणि शुभमन गिल (२०) हे दोन्ही भारताचे सलामीवीर लवकर बाद झाले. कर्णधार राहुलने स्टंपवर आलेला वाइड चेंडू खेळण्याच्या नादात आपली विकेट गमावली. तर गिल पॅडल स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. तैजुल इस्लामच्या चेंडूवर पायचीत होत भारताचा विराट कोहली अवघ्या एका धावेवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने ४५ चेंडूत ४६ धावा करत पलटवार केला, मात्र तो मेहदी हसनच्या गोलंदाजीवर बाद झाला.
ऋषभ बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि चेतेश्वर पुजारा यांनी ५व्या विकेटसाठी १४९ धावा जोडल्या. शतकाच्या उंबरठ्यावर असलेला पुजारा ९० धावांवर बाद झाला. त्याला तैजुलने बाद केले. मात्र, आधीच्या षटकात काहीतरी विचित्र घडले. या दरम्यान श्रेयस अय्यर सोबत घडलेल्या घटनेने सर्वानीच आश्चर्य व्यक्त केले तर बांगलादेशच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली.
भारतीय डावातील ८३व्या षटकातील ५वा चेंडू इबादत हुसैनने श्रेयस अय्यरला टाकला आणि चेंडू अय्यरच्या बचावात्मक शॉटच्या दृष्टीने थोडासा अलीकडेच टाकला. चेंडू नंतर ऑफ-स्टंपवरील काही बेल्सवर आदळला आणि बेल्स बऱ्यापैकी विस्कळीत झाल्या होत्या. त्या काही प्रमाणात चमकत देखील होत्या, मात्र डाव्या आणि मधल्या यष्टीवरील बेल्सनी खाली पडण्यास नकार दिला, बेल्स यष्टीवर राहूनच चमकत होत्या. बेल्स पडल्या नाहीत म्हणून श्रेयस अय्यर वाचला. ही परिस्थिती पाहून पुजाराला देखील हसू अनावर झाले तर बांगलादेशी खेळाडूंनी त्यांच्या नशिबाला दोष देत या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली.