ICC Cricket World Cup 2023: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील लढतीने आज (गुरुवारी) आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ही मोठी घोषणा स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांसाठी आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) हा विश्वचषक २०२३ संस्मरणीय करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आता स्पर्धेच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी, बीसीसीआयने चाहत्यांसाठी मोठी घोषणा केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी ५ ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर घोषणा केली आहे की, २०२३ च्या विश्वचषकादरम्यान स्टेडियममधील प्रेक्षकांना सर्व ठिकाणी मोफत पाणी दिले जाईल.

जय शाह आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, “येणारा काळ रोमांचकारी आहे. कारण २०२३ च्या विश्वचषकाच्या पहिल्या चेंडूची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत! विश्वचषकादरम्यान सर्व स्टेडियममधील प्रेक्षकांना आम्ही मोफत मिनरल आणि पॅकिंग केलेले पेयजल उपलब्ध करून देत आहोत. हे जाहीर करताना मला अभिमान वाटतो. हायड्रेटेड रहा आणि सामन्यांचा आनंद घ्या! सीडब्ल्यूसी २०२३ दरम्यान अविस्मरणीय आठवणी निर्माण करूया!”

हेही वाचा – World Cup 2023: सचिन तेंडुलकरने टीम इंडियाला दिला महत्त्वाचा सल्ला; म्हणाला, ‘बाद फेरीचा सामना पाकिस्तानविरुद्ध असेल, तर…’

सामने कुठे-कुठे खेळले जातील –

एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमसह १० मैदानांवर खेळवले जातील. यामध्ये हैदराबादचे राजीव गांधी स्टेडियम, धरमशालाचे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियम, चेन्नईचे एमए चिदंबरम स्टेडियम, लखनऊचे भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, पुण्याचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, बंगळुरुचे एम. चिन्नास्वामी स्टेडियम, मुंबईचे वानखेडे स्टेडियम आणि कोलकाताचे ईडन गार्डन यांचा समावेश आहे.

४६ दिवस चालणार विश्वचषक स्पर्धा –

भारतात आयोजित होणारा हा विश्वचषक ४६ दिवस चालणार आहे. या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी झाले आहेत. या संघाचे सामने १० वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवले जातील. एकूण ४८ सामने होणार आहेत. पहिल्या टप्प्यात, प्रत्येक संघ राउंड रॉबिन पॅटर्न अंतर्गत इतर ९ संघांसह प्रत्येकी एक सामना खेळेल. यानंतर टॉप-४ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Story img Loader