Jasprit Bumrah Statement on Hardik Pandya Booed in IPL 2024: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंडियन एक्सप्रेसच्या ‘एक्स्प्रेस अड्डा’ कार्यक्रमात हजेरी लावली होती. या मुलाखतीत बुमराहने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल आणि इतर अनेक मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य केले. यादरम्यान हार्दिक पंड्याकडे आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद दिले होते. यानंतर हार्दिकला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. पण या सगळ्यादरम्यान मुंबई इंडियन्सच्या संघात कसे वातावरण होते, यावर जसप्रीत बुमराहने वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – IND vs SL Live Streaming: भारत-श्रीलंका मालिकेचे सामने लाइव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या योग्य चॅनेल व मोबाईल अ‍ॅप

पाच वेळचा आयपीएल चॅम्पियन कर्णधार रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार करण्यात आले. पण हा निर्णय चाहत्यांना न पटल्याने चाहत्यांनी त्याची चांगलीच हुर्याे उडवली. हार्दिकसह घडत असणारं हे प्रकरण सारेच पाहत होते पण कोणीच यावर भाष्य केले नाही. हार्दिक संघाचा कर्णधार झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये दोन गट पडले होते अशी चर्चा सुरू होती. पण त्यादरम्यान खरंच संघात नेमके कसे वातावरण होते, हे बुमराहने सांगितले आहे.

हेही वाचा – Jaspreet Bumrah: जसप्रीत बुमराहशी खास संवाद एक्स्प्रेस अड्डावर

हार्दिक पंडयावर बुमराहचं मोठं वक्तव्य

हार्दिकची हुर्याे उडवली जात असताना संघात कसं वातावरण होतं, हे सांगताना बुमराह म्हणाला, “कधीकधी आम्हीही समजून घेतो की, आपण अशा देशात राहतो जिथे भावनांना अधिक महत्त्व आहे. आम्हालाही कळतं की चाहते भावनिक आहेत ते भावूक होतात. खेळाडूही भावनिक होतात. पण आपले चाहतेच तुमच्याबद्दल चांगलं बोलत नाहीयत याचा परिणाम एक भारतीय खेळाडू म्हणूनही होतो. पण आपल्याला खंबीरपणे याला सामोरे जावे लागते. आपण जर स्वत:वर लक्ष दिलं, आपल्या कामगिरीवर लक्ष दिलं तर आपण या सर्व गोष्टी नक्कीच परतवून लावू शकतो. पण हे सर्व सोपं नव्हतं. चाहते पावलोपावली त्यांचा राग व्यक्त करत होते, जो स्पष्टपणे ऐकू येत होता, जाणवत होता.”

यावर पुढे बुमराह म्हणाला, “पण अशावेळेस तुमचे सहकारी कायम सोबत असतात. एक संघ म्हणून आम्ही त्या गोष्टींना अजिबात प्रोत्साहन दिले नाही. एक संघ म्हणून आम्ही कायम त्याच्यासोबत होतो. आम्ही त्याच्याशी संवाद साधत होतो. त्याचं कुटुंब कायम त्याच्या पाठिशी होतं. काही गोष्टी या आपल्या नियंत्रणापलीकडे असतात. पण आम्ही वर्ल्डकप जिंकताच हे चित्रही बदलले.”

हेही वाचा – Olympics 2024: भारताच्या लेकींनी केली कमाल, तिरंदाजीत पहिल्या पदकाच्या दिशेने आश्वासक पाऊल, आता थेट…

“तुम्ही कायम आपल्याला आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी गांभीर्याने घेऊ शकत नाही. आताच्या घडीला लोक तुमचं गुणगान गात आहेत. पण आम्ही एखादा सामना गमावला तर हे चित्र पुन्हा बदलू शकतं. कारण आम्ही एक असा खेळ खेळत आहोत, जो खूप जास्त लोकप्रिय आहे आणि त्यामुळे प्रत्येक खेळाडूला यातून जावचं लागतं. फुटबॉलमध्ये पण आपण पाहतो की चाहते खेळाडूंची हुर्याे उडवतात. जगातील उत्कृष्ट खेळाडूंना या गोष्टीला सामोरे जावे लागते. हा सर्व एका खेळाडूच्या प्रवासाचा भाग आहे. पण या खेळात काही चांगल्या गोष्टीही आहेत.”

हेही वाचा – Olympics Opening Ceremony Parade Order: नदीवर होणार उद्घाटन सोहळा, परेडमध्ये नेहमी ग्रीसचे खेळाडू पहिले का? भारत कितव्या क्रमांकावर? वाचा सविस्तर

“एक संघ म्हणून एखाद्या खेळाडूला आम्ही असंच एकटं सोडू शकत नाही. आम्ही कायम एकमेकांसाठी असतो. आम्ही नेहमीच एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. मी हार्दिकसोबत बराच काळ क्रिकेट खेळलो आहे. आम्ही सर्वजण विरूद्ध जग असं होतं. आम्ही सर्वजण तेव्हा एकत्र होतो आणि जेव्हा जेव्हा त्याला गरज असेल तेव्हा आम्ही त्याच्यासोबत राहून त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला.” असे बुमराहने सांगितले.

आयपीएल २०२५ पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सचा संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार आणि कोणत्या खेळाडूंना रिलीज करणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jasprit bumrah statement on hardik pandya booed in ipl over rohit sharma captaincy controversy said its us against the world bdg
Show comments