Javed Miandad’s reaction to ODI World Cup 2023: पाकिस्तानचा माजी फलंदाज जावेद मियांदादने पुन्हा एकदा भारताविरुद्ध गरळ ओकली आहे. त्याच्या मते जोपर्यंत भारताचा संघ पाकिस्तानमध्ये खेळायला येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानने यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आणि इतर सामन्यांसाठी भारतात जाऊ नये. तो म्हणाला, पाकिस्तानच्या संघाला भारतात खेळायला न गेल्याने कोणताही फरक पडणार नाही. आता भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये येण्याची पाळी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयसीसीने तयार केलेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या मसुद्यानुसार, अहमदाबादमध्ये १५ ऑक्टोबरला भारत-पाक हाय-व्होल्टेज सामना होणार आहे. तथापि, ६६ वर्षीय पाकिस्तानचा माजी कर्णधाराचे म्हणने आहे की, आता भारताची पाकिस्तान दौऱ्याची पाळी आहे. मियांदाद म्हणाला, “पाकिस्तानचा संघ २०१२ आणि २०१६ मध्येही भारतात गेला होता. आता येथे येण्याची पाळी भारतीय संघाची आहे. जर निर्णय घेणे माझ्या हातात असते, तर मी भारतात कधीही कोणताही सामना खेळायला गेलो नसतो, अगदी विश्वचषकही नाही.आम्ही त्यांच्याशी (भारत) खेळण्यासाठी नेहमीच तयार असतो, परंतु ते कधीही तशाच प्रकारे प्रतिसाद देत नाहीत.”

भारतात न गेल्याने काही फरक पडणार नाही –

मियांदाद पुढे म्हणाला, “पाकिस्तान क्रिकेट मोठे आहे. आम्ही अजूनही दर्जेदार खेळाडू तयार करत आहोत. त्यामुळे आम्ही भारतात न गेल्याने आम्हाला काही फरक पडेल, असे मला वाटत नाही.” भारताने २००८ मध्ये ५० षटकांच्या आशिया चषकासाठी शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमधील तणावामुळे द्विपक्षीय क्रिकेट सामने होत नाहीत.

हेही वाचा – TNPL 2023: मुरुगन अश्विनने हवेत उडी मारून पकडला आश्चर्यकारक झेल, VIDEO होतोय व्हायरल

खेळांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे –

खेळांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे, असे मियांदादचे मत आहे. तो म्हणाला, “मी नेहमीच म्हणत आलो की, कोणीही आपला शेजारी निवडू शकत नाही. त्यामुळे एकमेकांना सहकार्य करणे चांगले. मी नेहमीच म्हणत आलो की क्रिकेट हा एक असा खेळ आहे, जो लोकांना जवळ आणतो. तसेच देशांमधील गैरसमज आणि तक्रारी दूर करू शकतो.”

आशिया चषकाच्या ‘हायब्रीड मॉडेल’वर मियांदादची प्रतिक्रिया –

मियांदादची प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे, जेव्हा पाकिस्तानला ‘हायब्रीड मॉडेल’ अंतर्गत आगामी आशिया चषक आयोजित करण्यास भाग पाडले जात आहे. भारत आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. भारतावर जोरदार टीका करणारा मियांदाद या निर्णयावर खूश नाही. तो म्हणाली, “आशिया चषकासाठी ते एकदाही आपला संघ पाकिस्तानला पाठवणार नाहीत, असा विश्वास होता. त्यामुळे आता आम्हीही कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Javed miandad said that pakistan team not going to india for the world cup will not make any difference vbm
Show comments