Kings Cup 2023 Final India vs Iraq: भारतीय फुटबॉल संघाला गुरुवारी (७ सप्टेंबर) किंग्ज कपच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. थायलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या ४९व्या किंग्स कपच्या उपांत्य फेरीत इराकविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात ७-६ने पराभव स्वीकारावा लागला. फिफा क्रमवारीत इराक ७०व्या तर भारत ९९व्या क्रमांकावर आहे. या सामन्यात टीम इंडियाचा पराभव होणार होता, मात्र अखेरच्या क्षणी झालेल्या चुकांमुळे त्यांचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले. निर्धारित ९० मिनिटे सामना २-२ असा बरोबरीत राहिल्यानंतर सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटमध्ये झाला. तिथे भारतीय संघाचा ४-५ असा पराभव झाला. यात काहीजण अंपायर्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

टीम इंडियाला किंग्स कप २०२३च्या अंतिम फेरीत प्रथमच पोहचण्याची संधी होती अन् भारताने आघाडीही घेतली होती. मात्र, दोन्ही वेळेस इराकला पेनल्टी किक मिळाली अन् त्यांनी निर्धारित वेळेत सामना २-२ असा सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात्र भारताला हार पत्करावी लागली. फर्नांडेसचा चुकलेला पहिला प्रयत्न भारताला चांगलाच महागात पडला. निर्धारित वेळेत इराकला मिळालेले दोन्ही पेनल्टी या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. रेफरीने भारतीय संघावर अन्याय केल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात सुरु आहे.

नौरेम महेश सिंगने सामन्याच्या १६व्या मिनिटाला भारतासाठी पहिला गोल केला. या गोलमुळे भारताने १-० अशी आघाडी घेतली. २८व्या मिनिटाला इराकला पेनल्टी मिळाली. याचा फायदा त्यांनी घेतला. इराकसाठी अल हमदीने गोल करत बरोबरी साधली. हाफ टाईम १-१ अशी बरोबरी होती. यानंतर ५१व्या मिनिटाला भारतीय संघाने पुन्हा आघाडी घेतली. मनवीरने संघासाठी दुसरा गोल केला. भारतीय संघाने पुन्हा एकदा सामन्यात आगेकूच केली.

हेही वाचा: IND vs PAK: शाहिद आफ्रिदीने गंभीरच्या ‘सामन्यातील खेळाडूंची मैत्री’ विधानावर केला पलटवार; म्हणाला, “हा त्यांचा विचार…”

दोनदा आघाडी घेतल्यानंतरही टीम इंडियाला विजय मिळवता आला नाही

टीम इंडियाला जेव्हा दुसऱ्यांदा आघाडी मिळाली तेव्हा आता सामना जिंकणार असे वाटत होते, पण इराकच्या खेळाडूंनी अनुभवाचा पुरेपूर फायदा घेतला. ७९व्या मिनिटाला इराकचा खेळाडू आयमानने कशी तरी पेनल्टी मिळवत संघाच्या बाजूने विजय खेचून आणला. भारतीय बचावपटूच्या चुकीचा फायदा त्याला मिळाला. इराकने ८०व्या मिनिटाला सामना बरोबरीत आणला. त्याच्यासाठी आयमेनने शानदार गोल केला. सामन्यात दोन वेळा आघाडी घेतल्यानंतर संघाला निर्धारित वेळेत विजय मिळवता आला नाही. इक्बालने भारताच्या फर्नांडेसच्या चेहऱ्यावर कोपरा मारला अन् रेफरीने लगेच त्याला रेड कार्ड देऊन बाहेर केले.

भारताचा ब्रँडन फर्नांडिस पेनल्टी शूटआऊट फटका चुकला

निर्धारित ९० मिनिटे सामना २-२ असा बरोबरीत राहिला. येथून पेनल्टी शूटआऊटमध्ये सामन्याचा निकाल लागला. भारत आणि इराकच्या प्रत्येकी पाच खेळाडूंनी शॉट्स घेतले. १० खेळाडूंपैकी फक्त एका खेळाडूला गोलपोस्टमध्ये चेंडू टाकता आला नाही आणि तो म्हणजे भारताचा ब्रँडन फर्नांडिस. त्याचा शॉट गोलपोस्टवर आदळल्यानंतर परत आला आणि इराकने पेनल्टीशूटमध्ये ५-४ असा सामना जिंकला.

हेही वाचा: World Cup Tickets: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; BCCI वर्ल्ड कप २०२३साठी ४लाख तिकिटे करणार जाहीर, ‘या’ दिवशी सुरु होणार बुकिंग

भारत अद्याप अंतिम फेरीत पोहोचलेला नाही

१९६८ मध्ये थायलंडमध्ये किंग्स कप सुरू झाला. त्यानंतर भारत अद्याप अंतिम फेरीत पोहोचू शकलेला नाही. १९७७ आणि २०१९ मध्ये तो तिसरा राहिला. यावेळीही संघाला तिसरे स्थान मिळवण्याची संधी असेल. तिसर्‍या क्रमांकासाठी १० सप्टेंबर रोजी थायलंड किंवा लेबनॉनशी सामना होईल.

Story img Loader