Maharashtra Kesari 2025 : अहिल्यानगरमध्ये आज (२ फेब्रुवारी) महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. या सामन्यात पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहळ यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला आहे. पैलवान पृथ्वीराज मोहळने पैलवान महेंद्र गायकवाडवर मात करत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. पैलवान पृथ्वीराज मोहोळने अंतिम फेरीत बाजी मारत ६७ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा पटकावली आहे.
पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहळ यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पैलवान पृथ्वीराज मोहळला चांदीची गदा आणि थार गाडी देण्यात आली आहे. पृथ्वीराज मोहळने महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी मोठा जल्लोष केला.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ, शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारली?
अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र, आज (२ फेब्रुवारी) या स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामन्यात मोठा गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ झाल्यामुळे स्पर्धेला गालबोट लागलं.उपांत्य फेरीचा सामन्यात पैलवान शिवराज राक्षेचा पराभव झाल्याचा निर्णय पंचांनी दिला. मात्र, पैलवान शिवराज राक्षेने पंचांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात नाराजी व्यक्त करत पंचाला लाथ मारल्याचा आरोप करण्यात आला.
पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात उपांत्य फेरीचा कुस्तीचा सामना रंगला होता. मात्र, पैलवान पृथ्वीराज मोहोळकडून शिवराज राक्षे पराभूत झाला. पण पराभूत होताच शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मैदानात काहीवेळ गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद काहीसा निवाळला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. हा गोंधळ झाल्यानंतर शिवराज राक्षेने या सामन्याचा रिव्ह्यू घेण्याची मागणी केली होती.