मुकुंद धस, कोइम्बतूर

महाराष्ट्राच्या मुलींनी मध्य प्रदेशचा ७६-४० असा धुव्वा उडवून कोइम्बतूर येथे सुरू असलेल्या ३६व्या राष्ट्रीय युवा बास्केटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग सुकर केला. महाराष्ट्राच्या मुलांना मात्र बलाढय़ हरयाणाकडून ५५-८३ अशा पराभवाला सामोरे जावे लागले.

सुरुवातीपासूनच एकतर्फी झालेल्या मुलींच्या लढतीत मध्य प्रदेशच्या खेळाडूंनी फारसा प्रतिकार केला नाही. शोमिरा बिडये आणि अस्मत कौर या द्वयीने आक्रमणात गुण मिळवण्याचा सपाटा लावला. पहिल्या सत्रात २६-१३ अशी भक्कम आघाडी घेतल्यानंतर महाराष्ट्राने आपल्या राखीव खेळाडूंना संधी दिली. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात महाराष्ट्राला आघाडी वाढवता आली नाही. शेवटच्या सत्रात पुन्हा अव्वल खेळाडूंना संधी देत महाराष्ट्राने २२ गुणांची कमाई करत सहज विजयाची नोंद केली. मध्य प्रदेशला अखेरच्या सत्रात एकच गुण मिळवता आला. मुलांना मात्र बलाढय़ हरयाणाकडून ५५-८३ असे पराभूत व्हावे लागले.