इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. केपटाऊन येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना खेळण्यात आला. यात एका महत्त्वाच्या क्षणी आफ्रिकेचा कप्तान डीन एल्गर बाद होण्यापासून बचावला. डीआरएसने एल्गरला जीवदान दिले. यानंतर विराटने तिसऱ्या पंचांबाबत आणि डीआरएसबाबत नाराजी व्यक्त केली. विराटचे वर्तन ‘लज्जास्पद’ असल्याचे वॉनने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोहलीला निलंबित करावे किंवा दंड करावा, अशी मागणी त्याने केली आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या अॅशेस कसोटीदरम्यान अॅडम गिलख्रिस्टसोबतच्या संभाषणात वॉन म्हणाला, ”कधी निर्णय तुमच्या बाजूने जातात, कधी तुमच्या विरोधात जातात. विराट कोहली हा महान खेळाडू आहे, पण त्याने कसोटी क्रिकेटमध्ये असे वागू नये. आयसीसीला हे थांबवावे लागेल, त्यांना भारतीय संघाला रोखावे लागेल. रवीचंद्रन अश्विन आणि विराट जे वागले, त्यातून तुम्ही सुटू शकत नाही. विराट कोहलीला एकतर दंड ठोठावण्यात यावा किंवा त्याला निलंबित केले जावे.”

भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात २१वे षटक टाकत होता. त्याचा चेंडू डीन एल्गरच्या पॅडला लागला. अंपायरने त्याला आऊट दिला. एल्गरने सहकारी फलंदाज कीगन पीटरसनला विचारणा करून या निर्णयाला आव्हान दिले. रिप्लेमध्ये सर्व काही ठीक होते, परंतु हॉकआय तंत्राने चेंडू स्टम्पवरून जात असल्याचे दाखवले आणि एल्गर थोडक्यात बचावला. हे पाहून भारतीय खेळाडू आश्चर्यचकित झाले. पंचांनाही या निर्णयाचा धक्का बसला.

हेही वाचा – IND vs SA : हे वागणं बरं नव्हं..! विराटचं कृत्य पाहून गौतम गंभीर भडकला; म्हणाला, “असा कॅप्टन…”

या घटनेनंतर विराट संतापला. तो स्टम्प माइकच्या जवळ गेला आणि म्हणाला, “तुमच्या संघावरही लक्ष केंद्रित करा, फक्त विरोधी संघावर लक्ष केंद्रित करू नका. सर्वच लोकांना पकडण्याचा प्रयत्न करा.” यानंतर अश्विनने ब्रॉडकास्टरवर निशाणा साधला, तो म्हणाला, ”सुपरस्पोर्ट जिंकण्यासाठी अधिक चांगली पद्धत अवलंबली पाहिजे.” त्याचवेळी केएल राहुल म्हणाला, ”संपूर्ण देश ११ लोकांच्या विरोधात खेळत आहे.”

Story img Loader