Mohammad Rizwan Says I am only a captain for toss and presentation : पाकिस्तानच्या संघाने मोहम्मद रिझवानच्या नेतृत्त्वाखाली २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक एकदिवसीय मालिका जिंकली आहे. मोहम्मद रिझवान ऑस्ट्रेलियन भूमीवर एकदिवसीय मालिका जिंकणारा पाकिस्तानचा दुसरा कर्णधार ठरला. रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिका २-१ खिशात घातली. मात्र, मालिका जिंकल्यानंतर कर्णधार मोहम्मद रिझवानने एक मोठं वक्तव्य केलं. तो म्हणाला, मी केवळ नाणेफेक आणि सामन्यानंतरच्या सादरीकरणासाठी कर्णधार आहे.

मोहम्मद रिझवान काय म्हणाला?

या मालिकेतून मोहम्मद रिझवानने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. मात्र, कर्णधार म्हणून त्याची सुरुवात पराभवाने झाली, पण पुढचे दोन सामने जिंकून पाकिस्तानने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली आणि २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका विजयाचा झेंडा फडकावला. सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभात मोहम्मद रिझवान म्हणाला, “माझ्यासाठी हा एक खास क्षण आहे, आज संपूर्ण देश खूप आनंदी असेल, गेल्या काही वर्षांत आम्ही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलो नव्हतो.”

‘मी फक्त नाणेफेक आणि सामन्यानंतरच्या सादरीकरणासाठी कर्णधार’ –

मोहम्मद रिझवान पुढे म्हणाला, “मी फक्त नाणेफेक आणि सामन्यानंतरच्या सादरीकरणासाठी कर्णधार आहे. इतरवेळी प्रत्येकजण मला क्षेत्ररक्षणसाठी, फलंदाजी आणि गोलंदाजी व्यवस्थित होण्यासाठी मदत करतात आणि सल्ले देतात. त्यामुळे या विजयाचे श्रेय सर्वांना जाते. कांगारुविरुद्ध ऑस्ट्रेलियात खेळणे सोपे नाही, त्यांच्या खेळाच्या शैलीला अनुकूल परिस्थिती आहे, परंतु आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. तसेच दोन्ही सलामीवीरांनी आमचा मार्ग सोपा केला.”

हेही वाचा – Wasim Akram : तब्बल ५५ हजारात कापले मांजरीचे केस! बिल पाहून वसीम अक्रम चकित; म्हणाला, ‘इतक्या पैशात तर पाकिस्तानात…’, पाहा VIDEO

मोहम्मद रिझवान चाहत्यांबद्दल पुढे म्हणाला, “त्यांना (चाहते) निकालाची फारशी पर्वा नसते, पण मायदेशात ते नेहमीच आमच्यासोबत असतात. त्यामुळे मला हा विजय त्यांना समर्पित करायचा आहे.” गेल्या काही काळापासून पाकिस्तानचा संघ कोणत्याही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करत नव्हता, पण या संघाने आता गेल्या पाचपैकी चार सामने जिंकले आहेत आणि सलग दोन मालिका जिंकण्यात यश मिळवले आहे. आता पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे.

Story img Loader