Mohammed Kaif Slams Team India: ऑस्ट्रेलियात भारतीय संघाची कामगिरी अत्यंत ढासळलेली पाहायला मिळाली. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी १-३ ने गमावल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना टीकेचा सामना करावा लागत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने भारतीय संघावर मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय संघाने जर आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला पराभत केलं तर ते सर्व विसरून जातील.
कैफने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “२३ तारखेला पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पराभूत कराल आणि मग सर्व जण तुमचं कौतुक करतील. सर्वच जण म्हणतील की, भारतीय संघ पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील चॅम्पियन आहे. पण जर भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) जिंकायची असेल तर एक मजबूत कसोटी संघ तयार करण्याची गरज आहे. संघाला टर्निंग ट्रॅकवर खेळायला शिकावे लागेल, ऑस्ट्रेलियामध्ये खेळाडूंना वेगवान गोलंदाजीविरूद्ध कसं खेळायचं हे शिकावे लागेल. सत्य हे आहे की संघ फक्त वनडे आणि टी-२० मधला चॅम्पियन आहे. आपण खूप मागे पडत आहोत.”
कैफ म्हणाला, “आपल्याला WTC जिंकायचे असेल तर खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व द्यावे लागेल. त्यांना टर्निंग ट्रॅकवर खेळावे लागेल, सीमिंग ट्रॅकवर सराव करावा लागेल, अन्यथा आपण जिंकू शकणार नाही. ३-१ असा पराभव हा इशारा म्हणून घ्यावा, असेही कैफ म्हणाला. भारताने कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. फक्त गौतम गंभीरच दोषी नाही तर सर्वच खेळाडू तितकेच दोषी आहेत.
कैफ पुढे म्हणाला, सर्व खेळाडूंना रणजी ट्रॉफी खेळण्याची संधी मिळते, पण यामुळे खेळाडू थकतात आणि मग रणजी खेळणं बंद करतात. जर ते रणजी ट्रॉफी नाही खेळले, सराव सामने नाही खेळले तर ते एक चांगला खेळाडू म्हणून कसे तयार होतील? आणि मग वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी निसटत जाईल. मी तर खरंच सांगतो, जे झालं ते चांगलंच झालं. आता कसोटी क्रिकेटवर काम करण्याची वेळ आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडूंना मैदानावर फार काळ थांबून मोठी कामगिरी करता आली नाही आणि त्याचाच संघाला मोठा फटका बसला.
© IE Online Media Services (P) Ltd