Mohammed Shami on Team India playing 11 : एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये मोहम्मद शमीने अप्रतिम गोलंदाजी केली आणि २४ विकेट्स घेतल्या. शमीच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला. यानंतर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ विकेट्सनी पराभव करत विश्वचषकावर नाव कोरले. ज्यामुळे भारताचे तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. विशेष म्हणजे या विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यात शमी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पण नव्हता.

मात्र, हार्दिक पंड्याला दुखापत झाल्यानंतर त्याला संघात स्थान मिळाले. यानंतर शमीने आपल्या अप्रतिम गोलंदाजीने संपूर्ण स्पर्धेत धुमाकूळ घातला. आता या प्रकरणावर शमीने एक खास वक्तव्य केले असून त्यामुळे चाहत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. मोहम्मद शमीने गेल्या महिन्यात झालेल्या सीएट क्रिकेट पुरस्कारादरम्यान त्याच्या विश्वचषक मोहिमेबद्दल सांगितले, ज्याचा व्हिडिओ रविवारी स्टार स्पोर्ट्सने शेअर केला.

तीनही विश्वचषकांमध्ये शमी पहिल्या पसंतीचा खेळाडू नव्हता –

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, अँकर मयंती लँगरशी बोलताना शमीने विश्वचषकातील पदार्पणाबद्दल सांगितले, तो म्हणाला, “तीनही एकदिवसीय विश्वचषकांमध्ये तो पहिल्या पसंतीचा खेळाडू नव्हतो. मात्र, नंतर निवड झाल्यानंतर, चमकदार कामगिरी करत प्रशिक्षक आणि कर्णधाराला विचार करण्यास भाग पाडले. यानंतर माझी कामगिरी पाहता त्यांनी मला संघाबाहेर ठेवण्याचा कधी विचारही केला नाही.”

हेही वाचा – PAK vs BAN Test Series : लाजिरवाण्या पराभवानंतर अहमद शहजादने पाकिस्तानची उडवली खिल्ली; म्हणाला, ‘बांगलादेशने तुम्हाला तुमच्याच…’

मैदानापासून दूर राहूनही तो चांगली कामगिरी कशी करू शकतो, असे शमीला विचारले असता तो म्हणाला, मला वाटते की मला याची सवय झाली आहे. २०१५, २०१९ आणि २०२३ मध्येही माझी अशीच सुरुवात झाली होती. जेव्हा मला संधी मिळाली, तेव्हा देवाचे (अल्लाचे) आभार मानले की माझ्या कामगिरीने मला पुन्हा ती संधी दिली. ज्यामुळे मी संघातून बाहेर झालो नाही. तुम्ही याला कठोर परिश्रमही म्हणू शकता, परंतु मी संधीसाठी नेहमीच तयार असतो. जेव्हा तुम्ही तयार असाल तेव्हाच तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता. नाहीतर मी फक्त पाणी देण्यासाठी मैदानात धावताना दिसू शकता. जेव्हा एखादी संधी मिळते तेव्हा त्याचा फायदा घेऊन संधीचे सोने करणे गरजेचे असते.”

हेही वाचा – PAK vs BAN : ‘और कितना रुलाओगे…’, लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानी चाहते खेळाडू आणि पीसीबीसह पंतप्रधानांवरही संतापले

त्याच वेळी, जेव्हा शमी हे बोलत होता, तेव्हा पुरस्कारांसाठी उपस्थित असलेले रोहित शर्मा आणि माजी प्रशिक्षक राहुल द्रविड देखील त्याचे ऐकत होते आणि हसत होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मोहम्मद शमी एकदिवसीय विश्वचषकात ५० पेक्षा जास्त बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आङे. शमीने एकदिवसीय विश्वचषकात १७ सामन्यात ५० विकेट्स घेणारा सर्वात वेगवान गोलंदाज आहे, त्याने मिचेल स्टार्कला (१९ सामने) मागे टाकले आहे. शमीने आतापर्यंत १८ सामन्यात १३.५२ च्या सरासरीने ५५ विकेट्स घेतल्या आहेत.