Indian History in Olympic Games : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ या स्पर्धेला २६ जुलैपासून सुरूवात होत आहे. २०६ देशांतील खेळाडू खेळातील सर्वात मोठ्या मंचावर पदकांसाठी स्पर्धा करतील. या स्पर्धेसाठी भारताचा ११७ खेळाडूंचा संघही पॅरिसला जाणार आहे. भारताचा ऑलिम्पिक खेळांचा इतिहास १२४ वर्षांचा आहे. या खेळांमध्ये भारताने २७ वेळा भाग घेतला आहे. १९०० मध्ये भारताने पहिल्यांदा या खेळांमध्ये भाग घेतला होता. त्या वर्षीही पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. १२४ वर्षात भारताने या खेळांमध्ये खूप काही मिळवले आहे.

१९०० मध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये घेतला होता भाग –

ऑलिम्पिक या खेळाच्या स्पर्धेला १८९६ पासून सुरुवात झाली आहे पण भारताने १९०० सालापासून ऑलिम्पिक खेळांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. १९०० मध्ये फक्त एका खेळाडूने भारताचे प्रतिनिधित्व केले होते, तो खेळाडू नॉर्मन प्रिचर्ड होता. त्याने देशासाठी दोन पदके जिंकली आहेत. प्रिचार्डने २०० मीटर आणि २०० मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. ऑलिम्पिक संघटनेच्या म्हणण्यानुसार ही पदके भारताच्या खात्यात मोजली जातात, तर जागतिक ॲथलेटिक्सनुसार ही पदके ब्रिटनच्या खात्यात जमा आहेत.

भारताने हॉकीमध्ये सर्वाधिक पदके जिंकली –

भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हॉकीमध्ये भारताने आतापर्यंत सर्वाधिक पदके मिळवली आहेत. या खेळात भारताने १२ पदके जिंकली आहेत. या १२ पदकांपैकी भारताने आठ सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदके जिंकली आहेत. भारताला पहिले पदक १९२८ च्या मिळाले, जेव्हा भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकले. यानंतर ४१ वर्षांच्या पदकांच्या दुष्काळानंतर भारताने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.

हेही वाचा – Team India : टी-२० कर्णधारपदासाठी सूर्या-हार्दिकमध्ये रस्सीखेच, कोण होणार टीम इंडियाचा ‘कॅप्टन’? पाहा दोघांची आकडेवारी

भारताने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये ३५ पदके जिंकली आहेत –

भारताने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये १० सुवर्ण, ९ रौप्य आणि १६ कांस्य अशी एकूण ३५ पदके जिंकली आहेत. भारताने ८ वेगवेगळ्या खेळांमध्ये ही ३५ पदके जिंकली. भारताने हॉकीमध्ये १२, नेमबाजीत चार, ॲथलेटिक्समध्ये तीन, कुस्तीमध्ये सात, बॅडमिंटनमध्ये तीन, वेटलिफ्टिंगमध्ये दोन, बॉक्सिंगमध्ये तीन आणि टेनिसमध्ये एक पदके जिंकली आहेत.

क्रीडा सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
हॉकी ८ १ ३ १२
कुस्ती ० २ ५ ७
शूटिंग १ २ १ ४
ऍथलेटिक्स १ २ ० ३
बॉक्सिंग ० ० ३ ३
वेटलिफ्टिंग ० १ १ २
टेनिस ० ० १ १

टोकियो ऑलिम्पिकमध्ये केली सर्वोत्तम कामगिरी –

२०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सर्वोत्तम कामगिरी केली. टोकियोमध्ये भारताने सात पदके जिंकली. भारताने ॲथलेटिक्समध्ये एक, वेटलिफ्टिंगमध्ये एक, हॉकीमध्ये एक, बॉक्सिंगमध्ये एक, बॅडमिंटनमध्ये एक आणि कुस्तीमध्ये दोन पदकं जिंकली.

हेही वाचा – पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताकडून ११७ खेळाडू; १४० सहाय्यकांनाही मंजुरी; गोळाफेक प्रकारात आभा खातुआला डच्चू

खेळ नाव पदक
अॅथलेटिक्स नीरज चोप्रा (भालाफेक) सुवर्ण
कुस्ती रवी दहिया रौप्य
कुस्ती बजरंग पुनिया कांस्य
बॉक्सिंग लोव्हलिना बोर्गोहेन कांस्य
वेटलिफ्टिंग मीराबाई चानू रौप्य
बॅडमिंटन पीव्ही सिंधू कांस्य
हॉकी पुरुष संघ कांस्य