मुंबई : बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत जगभरातील संघ खेळतात. त्यामुळे जेतेपद पटकावणे अत्यंत अवघड असते. भारताला या स्पर्धेत ‘सुवर्ण’यश मिळवण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागली. मात्र, आता भारतीय संघ यशस्वी ठरला असून या जेतेपदाला ऑलिम्पिक सुवर्णपदकाचेच तेज प्राप्त झाले आहे, असे मत ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांनी व्यक्त केले.

यंदा बुडापेस्ट (हंगेरी) येथे झालेल्या ऑलिम्पियाड स्पर्धेत खुल्या विभागात विक्रमी १९३ संघ, तर महिला विभागात १८१ संघ सहभागी झाले होते. खुल्या विभागातील भारतीय पुरुष संघाने उत्कृष्ट कामगिरी करताना ११ फेऱ्यांमध्ये अपराजित राहत जेतेपदावर मोहोर उमटवली. बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतील भारताचे हे पहिले जेतेपद ठरले. भारतासाठी हे यश अत्यंत महत्त्वाचे असले, तरी हा स्तर कायम राखण्याकरिता आणखी गुणवान बुद्धिबळपटू तयार करणे आवश्यक असल्याचे ठिपसे यांना वाटते.

हेही वाचा >>>IND vs BAN: “…म्हणून मी बांगलादेशची फिल्डिंग सेट केली”, ऋषभ पंतने दिलं अजय जडेजाचा उल्लेख करत दिलं मनं जिंकणारं उत्तर

‘‘गुकेश, अर्जुन एरिगेसी आणि आर. प्रज्ञानंद हे पुढील काही वर्षे बुद्धिबळविश्वात आपला लौकिक राखतील असे म्हणायला हरकत नाही. २०२६ आणि २०२८च्या जागतिक अजिंक्यपद लढतीत भारतीय बुद्धिबळपटू चमकदार कामगिरी करताना दिसू शकतील. मात्र, इतक्यावरच समाधान मानणे योग्य ठरणार नाही. बुद्धिबळविश्वात रशियाप्रमाणे दीर्घकाळ वर्चस्व गाजवायचे झाल्यास भारताने आणखी खेळाडू शोधणे, त्यांना तयार करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि स्थानिक पातळीवर अधिकाधिक स्पर्धा खेळण्याची संधी देणे गरजेचे आहे. या नव्याने उदयास आलेल्या खेळाडूंना प्रस्थापितांकडून मार्गदर्शन मिळाले पाहिजे. गुकेश, प्रज्ञानंद आणि अर्जुनसारख्या खेळाडूंशी त्यांचा संवाद घडवून आणला पाहिजे. ही पावले उचलली गेली, तर भारत निश्चितपणे बुद्धिबळातील ‘महासत्ता’ म्हणून नावलौकिक राखू शकेल,’’ असे ठिपसे यांनी नमूद केले.

ऑलिम्पियाड सुवर्णपदकापर्यंतच्या प्रवासाविषयी ठिपसे म्हणाले, ‘‘करोनाकाळात भारतीय बुद्धिबळात मोठी क्रांती झाली. या काळात बुद्धिबळपटूंची नवी पिढीच तयार झाली. त्यातच २०२२ मध्ये ऑलिम्पियाडचे यजमानपद भूषवण्याचा धाडसी निर्णय घेतल्याने भारताला खुल्या आणि महिला अशा दोन्ही विभागांत प्रत्येकी तीन संघ खेळवण्याची संधी मिळाली. पूर्वी तेच तेच खेळाडू ऑलिम्पियाड खेळत होते. मात्र, २०२२ च्या स्पर्धेत युवा खेळाडूंना गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळाली. खुल्या विभागात अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेल्या भारत-१ संघाला दुसरे, तर युवकांच्या भारत-२ संघाला ११वे मानांकन होते. मात्र, गुकेश, निहाल सरीन यांसारख्या युवकांच्या चमकदार कामगिरीमुळे भारत-२ संघाने कांस्यपदक मिळवले, तर भारत-१ संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताचे युवा खेळाडू गुणवत्तेमुळे नाही, तर केवळ कमी वय आणि क्रमवारीतील गुण यामुळे मागे असल्याचे स्पष्ट झाले. हळूहळू त्यांनी क्रमवारीतही सुधारणा केली आणि भारताचा अधिक मजबूत संघ तयार झाला. याचाच फायदा यंदाच्या स्पर्धेत मिळाला.’’