पीटीआय, नवी दिल्ली

पॅरिस स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करतानाच २०३६च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवण्याचे देशाचे स्वप्न असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनी म्हणाले. यासाठी आपण तयारीलाही सुरुवात केल्याचे प्रतिपादन मोदींनी लाल किल्ल्यावर गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात केले.

भारतासह सौदी अरेबिया, कतार आणि तुर्की हे देश ऑलिम्पिक आयोजनासाठी उत्सुक आहेत. पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची (आयओसी) निवडणूक होणार असून त्यानंतर यजमानपदाबद्दलचा निर्णय अपेक्षित आहे. ‘‘२०३६च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवणे हे संपूर्ण भारताचे स्वप्न आहे. आम्ही त्या दृष्टीने तयारीला सुरुवात केली आहे,’’ असे मोदी म्हणाले.

हेही वाचा >>>IND vs SL: सुपर ओव्हरचं विसरले अंपायर; भारत-श्रीलंका सामना राहिला टाय

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नवी दिल्ली आणि इतर शहरांमध्ये जी-२० शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन करून भारतातील विद्यामान पायाभूत सुविधांचे दर्शन जगाला घडल्याचे पंतप्रधान म्हणाले. तसेच अत्यंत मोठ्या स्तरावरील कार्यक्रम आयोजित करण्याची भारताची क्षमताही सिद्ध झाल्याचे मोदी यांनी नमूद केले. भारताच्या ऑलिम्पिक आयोजनाच्या महत्त्वाकांक्षेला ‘आयओसी’ अध्यक्ष थॉमस बाख यांचा पाठिंबा लाभला आहे. मात्र, पुढील वर्षी बाख यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. भारताने इतक्या मोठ्या स्तरावरील अखेरची स्पर्धा २०१० मध्ये आयोजित केली होती. त्यावेळी दिल्ली येथे राष्ट्रकुल स्पर्धा झाली होती. २०३६ ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी सध्या अहमदाबाद शहर आघाडीवर असल्याचे समजते.

ऑलिम्पिकवीरांचे कौतुक

स्वातंत्र्यदिनी मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंचे कौतुक केले. ‘‘ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा उंच फडकवणारे तरुण आज आपल्याबरोबर आहेत. १४० कोटी देशवासीयांच्या वतीने मी आपल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करतो,’’ असे मोदी म्हणाले.

लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके मिळवणारी नेमबाज मनू भाकर, तारांकित गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याच्यासह कांस्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघातील खेळाडू उपस्थित होते.

हेही वाचा >>>Independence Day 2024: महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैनाने १५ ऑगस्ट रोजीच का जाहीर केली निवृत्ती? रैनाने केला मोठा खुलासा

पॅरालिम्पिकसाठी शुभेच्छा

पंतप्रधानांनी आगामी पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छाही दिल्या. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत रंगणार आहे. ‘‘येत्या काही दिवसांत भारताचे आणखी एक पथक पॅरालिम्पिकसाठी रवाना होणार आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो,’’ असे मोदी म्हणाले. टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताने १९ पदके जिंकली होती, ज्यात पाच सुवर्णपदकांचा समावेश होता. या वेळी ८४ पॅरा-खेळाडूंचे पथक पॅरिस येथील स्पर्धेत सहभाग नोंदवणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिकवीरांची गुरुवारी आपल्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी मोदी यांनी पॅरिस स्पर्धेत नेमबाजीच्या १० मीटर पिस्तूल प्रकारात दोन कांस्यपदके मिळवणाऱ्या मनू भाकरकडून तिच्या पिस्तूलाची माहिती जाणून घेतली. तसेच ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरे कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाने मोदींना ‘हॉकी स्टीक’ भेट दिली. यावर सर्व खेळाडूंची स्वाक्षरी होती. कांस्यपदक विजेता कुस्तीगीर अमन सेहरावतने आपली स्वाक्षरी असलेली जर्सी मोदींना भेट केली. ‘‘पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या भारतीय पथकाची भेट घेऊन खूप आनंद झाला. त्यांचे अनुभव जाणून घेतले आणि स्पर्धेतील कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले,’’ असे मोदी यांनी ‘एक्स’वर (आधीचे ट्विटर) लिहिले.