India vs Nederland’s, World Cup 2023: श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊटनंतर बाद करण्याच्या या पद्धतीची चर्चा सुरूच आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड याला जेव्हा या प्रकरणी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने यावर सूचक विधान केले आहे. राहुलला हा प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, “भारतीय संघ जरी कोणाच्याही विरोधात टाईम आऊटसाठी अपील करत नसला तरी, जर कोणी असे केले तर ते नियमांतर्गत आहे आणि त्यात काहीही चुकीचे नाही.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संधी मिळाली तरी भारत ‘टाईम आऊट’ करणार नाही, असे संकेत भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिले. मात्र, बाद करण्याची पद्धत खेळाच्या नियमांत असल्याने कोणीही कोणाला दोष देऊ शकत नाही, असे तो म्हणाला. द्रविड रविवारी, १२ नोव्हेंबर रोजी बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर नेदरलँड्सविरुद्ध भारत शेवटचा आणि अंतिम साखळी सामना खेळणार आहे.

द्रविड टाईम आऊटवर पुढे म्हणाला की, “तुम्ही म्हटल्याप्रमाणे, भिन्न लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. आपले स्वतःचे मन, स्वतःचे विचार आहेत. आपल्यापैकी प्रत्येकजण एखाद्या विशिष्ट परिस्थितीबद्दल वेगळा विचार करतो. त्यात खरंच बरोबर किंवा चूक असे नसते कारण, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत ही वेगळी आहे. तुम्ही दोन्ही बाजूंवर वाद घालू शकता. नियम जसे आहेत तसे पाळले पाहिजेत किंवा क्रिकेटच्या खेळ भावनेसाठी काहीवेळा थोडी शिथिलता केली पाहिजे. या दोन्ही मुद्यांवर वर्षानुवर्षे चर्चा सुरूच आहे. अशा परिस्थितीत लोक दोन्ही प्रकारची मते देत असतात.”

हेही वाचा: PAK vs ENG: इंग्लंडचा शेवट गोड! पाकिस्तानवर ९३ धावांनी दणदणीत विजय, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी झाला पात्र

अँजेलो मॅथ्यूजच्या विरोधात अपील केल्यानंतर शाकिब-अल-हसनला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले आणि माजी क्रिकेटपटूंनीही त्याच्यावर बरीच टीका केली. मॅथ्यूज बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट होणारा पहिला फलंदाज ठरला. सामन्यानंतर मॅथ्यूजने बांगलादेश क्रिकेट संघावर टीका केली आणि ही घटना अपमानास्पद असल्याचे म्हटले. “एमसीसीने ठरवून दिलेल्या कायद्यांचे पालन केल्याबद्दल शकिबला दोष देऊ नये,” असे द्रविड म्हणाला.

द्रविड म्हणाला, “असे मतभेद असणे ठीक आहे. काही लोक या घटनेशी सहमत नसतील, तर काही जण म्हणतील की ‘नियमप्रमाणे खेळणे आवश्यक आहे. मला वाटत नाही की जर एखाद्याला आयसीसीने तयार केलेल्या नियमांचे पालन करायचे असेल तर ते चुकीचे आहे. दुसरीकडे जर, खेळभावना जपायची असेल तर त्याने जपावी. आम्ही दुसऱ्या बाजूने विचार करू.”

हेही वाचा: IND vs NED: नेदरलँड्सविरुद्ध अश्विन-इशानला संधी मिळणार की विजयी संघाबरोबर जाणार? जाणून घ्या रोहित शर्माची रणनीती

पुढे द्रविड म्हणाला की, “जर एखादा खेळाडू नियमांची मोडतोड करत असेल तर त्याच्याविरोधात तुम्ही तक्रार करू शकता. मात्र जर, तो प्रामाणिकपणे फक्त नियमांचे पालन करत असेल तर त्याचाही आपण विचार करायला हवा. तुम्ही तसे स्वतः करू शकत नाही, आम्हीही तसे करणार नाही. परंतु आयसीसीने तो नियम केल्यामुळे तुम्ही ते पाळल्याबद्दल कोणालाही दोष देऊ शकत नाही. कोणी काय करायचे किंवा नाही करायचे हे सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न असतो.”

भारताने या विश्वचषकात सर्व आठ सामने जिंकले आहेत आणि उपांत्य फेरीपूर्वी अपराजित राहण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाने प्रतिस्पर्ध्यांना १०० पेक्षा कमी धावसंख्येवर गुंडाळण्यात यश मिळवले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul dravids statement on time out controversy india may not do this but we cannot blame anyone avw
Show comments