मुंबई : भारतीय कसोटी संघातील स्थान गमावलेल्या शार्दूल ठाकूरच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात आसामचा दोन दिवसांतच एक डाव आणि ८० धावांनी धुव्वा उडवला. पहिल्या डावात सहा गडी बाद करणाऱ्या वेगवान गोलंदाज शार्दूलने दुसऱ्या डावातही अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना ३१ धावांत चार बळी मिळवले.
वांद्रे क्रीडा संकुल येथील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात यजमान मुंबईने आसामला पूर्णपणे निष्प्रभ केले. पहिल्या डावात आसामला ८४ धावांत गुंडाळणाऱ्या मुंबईने आपल्या पहिल्या डावात २७२ धावांची मजल मारली. त्यामुळे मुंबईला १८८ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर आसामच्या फलंदाजांचा दुसऱ्या डावातही मुंबईच्या गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. आसामचा दुसरा डाव अवघ्या ३३ षटकांत १०८ धावांत संपुष्टात आल्याने मुंबईने दोन दिवसांत विजय मिळवला. यासह उपांत्यपूर्व फेरीसाठी आपण पूर्णपणे सज्ज असल्याचेही मुंबईच्या संघाने दाखवून दिले.
हेही वाचा >>> Ranji Trophy 2024 : चेतेश्वर पुजाराने ‘बॅझबॉल’ शैलीत झळकावले दमदार शतक, टीम इंडियात परतण्याचे दिले संकेत
दुसऱ्या दिवशी ६ बाद २१७ धावांवरून पुढे खेळणाऱ्या मुंबईचा पहिला डाव २७२ धावांवर संपुष्टात आला. शिवम दुबेने एक बाजू लावून धरताना १४० चेंडूंत ११ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद १२१ धावा केल्या. मात्र, त्याला तळाच्या फलंदाजांची साथ मिळाली नाही.
यानंतर आसामचा दुसरा डावही गडगडला. सुमित घाडीगावकर (नाबाद ३०) आणि अब्दुल कुरैशी (२२) यांचा अपवाद वगळता आसामचा एकही फलंदाज २० धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही. त्यामुळेच मुंबईला मोठा विजय साकारण्यासह ब-गटातील अग्रस्थान निश्चित करता आले.
संक्षिप्त धावफलक
* आसाम (पहिला डाव) : ८४
* मुंबई (पहिला डाव) : ६४.४ षटकांत सर्वबाद २७२ (शिवम दुबे नाबाद १२१, शम्स मुलानी ३१; दिबाकर जोहरी ५/७४, राहुल सिंह २/४२)
* आसाम (दुसरा डाव) : ३३ षटकांत सर्वबाद १०८ (सुमित घाडीगावकर नाबाद ३०, अब्दुल कुरैशी २२; शार्दूल ठाकूर ४/३१, मोहित अवस्थी २/१०, तुषार देशपांडे २/३७)
शार्दूल ठाकूर