वृत्तसंस्था, बडोदा

पहिल्या डावातील पिछाडीनंतर ऑफ-स्पिनर तनुष कोटियनने (५/६१) केलेल्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात बडोद्याविरुद्ध मुंबईने दमदार पुनरागमन केले. बडोद्याचा दुसरा डाव १८५ धावांवर संपुष्टात आल्याने मुंबईला २६२ धावांचे आव्हान मिळाले. याचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेर मुंबईची २ बाद ४२ अशी धावसंख्या होती आणि विजयापासून ते २२० धावा दूर आहे.

बडोदा येथे सुरू असलेल्या या सामन्यात पहिले दोन दिवस अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरल्यानंतर गतविजेत्या मुंबईने तिसऱ्या दिवशी आपला खेळ उंचावला. भारतीय कसोटी संघाची दारे ठोठावत असलेल्या कोटियनने आपली गुणवत्ता पुन्हा सिद्ध करताना बडोद्याचा निम्मा संघ गारद केला. त्याने पहिल्या डावातही चार बळी मिळवले होते.

हेही वाचा >>>Sanju Samson : संजूने इशानला मागे टाकत मोडला डी कॉकचा विक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

बडोद्याने पहिल्या डावात ७६ धावांची आघाडी मिळवली होती. मात्र, दुसऱ्या डावात त्यांच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. तिसऱ्या दिवशी बिनबाद ९ धावांवरून पुढे खेळताना बडोद्याचा दुसरा डाव १८५ धावांतच आटोपला. बडोद्याची एकवेळ ६ बाद ४१ अशी स्थिती होती. मग कर्णधार कृणाल पंड्या (१४४ चेंडूंत ५५), अतित शेठ (५७ चेंडूंत २६) आणि महेश पिठिया (६० चेंडूंत ४०) यांनी महत्त्वपूर्ण योगदान देत बडोद्याला सन्मानजनक धावसंख्या करून दिली.

मुंबईला २६२ धावांचे आव्हान मिळाले. मुंबईने पृथ्वी शॉ (१२) आणि हार्दिक तामोरे (६) यांना झटपट गमावले. दिवसअखेर आयुष म्हात्रे (नाबाद १९) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (नाबाद ४) खेळपट्टीवर होते. अजून श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, शम्स मुलानी, शार्दूल ठाकूर आणि कोटियन यांसारखे फलंदाज शिल्लक असल्याने मुंबईला विजयाची संधी आहे.

संक्षिप्त धावफलक

● बडोदा (पहिला डाव) : २९०

● मुंबई (पहिला डाव) : २१४

● बडोदा (दुसरा डाव) : ६०.३ षटकांत सर्वबाद १८५ (कृणाल पंड्या ५५, महेश पिठिया ४०, अतित शेठ २६; तनुष कोटियन ५/६१, हिमांशू सिंह ३/५०)

● मुंबई (दुसरा डाव) : १०.३ षटकांत २ बाद ४२ (आयुष म्हात्रे नाबाद १९, पृथ्वी शॉ १२; महेश पिठिया १/१०)